रांग ही काय नवीन गोष्ट नाही. मुंग्यांचं तर उभं आयुष्य रांगेत जात असावं. रांगेत नसलेली आणि निवांत एखाद्या दगडावर पुरुष मुंगीशी गप्पा मारत बसलेली मुंगी मी कधी बघितलेली नाही. पण मुंग्यांची रांगेबद्दल तक्रार नसावी. अन्यथा इतक्मया वर्षात रांग मोडणाऱया मुंग्यांची नवीन जात उत्क्रांत झाली असती.
माणसांना मात्र रांग अटळ असते आणि असह्यदेखील होते. रांगेत उभं रहावं लागलं की माणसं करवादतात, रांग मोडण्याचा प्रयत्न करतात, कुठून तरी वशिला लावून रांग टाळण्याचा प्रयत्न करतात. आमच्या लहानपणी रॉकेल, साखर वगैरेची टंचाई असे. रेशनच्या दुकानात या वस्तू आल्या की पिशव्या, डबे, बाटल्या घेऊन लहान मुलं धावत जाऊन रांग लावीत. थोडय़ा वेळाने मोठी माणसं पैसे घेऊन येत.
मोठेपणी सिनेमाच्या तिकिटांसाठी रांगेत उभा राहिलो. तिथे धटिंगण आणि/किंवा गुंड रांगेत घुसायचे. औरंगाबादला असताना काही चित्रपटगृहात रांगेची पद्धत नसे. मग तिकीट खिडकीवर चारी बाजूंनी रसिक हल्ला चढवीत. अशा वेळी काही लोक हातात टाचणी घेऊन गर्दीत घुसत आणि समोरच्या माणसाला विशिष्ट ठिकाणी टाचणी टोचीत. त्याचा तोल जाऊन तो शेजारच्या माणसावर पडला की तयार झालेल्या फटीतून मागची माणसे पुढे घुसत. टाचणी टोचण्यावरून आठवलं. तूर्तास टोचून घेण्यासाठी सगळीकडे रांगा दिसतात. लसीकरण केंद्रावर अगदी सकाळपासून माणसं रांगेत उभी असतात. नंबर येईतो ते व्हॉट्सऍपवर आलेले संदेश वाचत-फॉरवर्ड करीत असतात. बहुतेकांच्या हातात स्वस्तातले चिनी मोबाईल असतात असा माझा आंधळा तर्क. कारण आयपॉड वगैरे बाळगण्याची ऐपत असलेला रांगेत कशाला उभा राहील, तो सरळ खाजगी दवाखान्यात जाऊन स्पुटनिकसारखी लस घेऊन ‘बाई मी विकत घेतली लस’ असे गुणगुणत बाहेर येऊ शकतो. या दुष्ट चिन्यांनी जगावर कोरोना लादला. चीन आपला शत्रू आहे. दिवाळीत आपण चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून त्याला नामोहरम करीत असतो. पण शहरात चिनी फोन्सची दुकाने जागोजागी दिसतात. त्या अर्थी बहिष्काराच्या यादीत चिनी फोन्सचा समावेश नसावा. स्वस्त चिनी फोन नसते तर लशीसाठी रांगेत उभ्या लोकांनी तीन तीन तास वेळ घालवण्यासाठी कथा-कादंबऱया वगैरे वाचल्या असत्या. चीनमुळेच एकंदर वाचन संस्कृती धोक्मयात आली आहे असे नम्रपणे म्हणावेसे वाटते.