अमरावतीला एकमात्र राजधानी करण्याची मागणी
वृत्तसंस्था / अमरावती
अमरावती क्षेत्रातील 29 गावांमधील शेतकऱयांनी सोमवारी दुसरी महा पदयात्रा काढली असून आंध्रप्रदेश सरकारकडे अमरावतीला एकमात्र राज्याची राजधानी म्हणून विकसित करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश लागू करण्याची मागणी केली आहे. शेतकऱयांनी प्रथम वेंकटपलेमममध्ये श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात पूजा केली आहे. त्यानंतर अमरावती परिरक्षण समिती (एपीएस) आणि अमरावती शेतकऱयांच्या संयुक्त कारवाई समितीचे पदाधिकारी तसेच सदस्यांनी पदयात्रा सुरू केली. शेतकऱयांनी राज्यात तीन राजधान्यांच्या विरोधात पदयात्रेचे आवाहन केले आहे.
पदयात्रेत शेतकरी, शेतमजूर, महिला आणि विविध क्षेत्रांमधील लोक सहभागी झाले आहेत. तीन राजधान्यांचा निर्णय राज्य सरकार मागे घेत नाही तोवर लढाई सुरूच ठेवण्याची शपथ या आंदोलकांनी घेतली आहे. सत्तारुढ वायएसआर काँग्रेस पक्ष वगळता सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत पदयात्रा सुरू होताच ‘जय अमरावती’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे.
अन्य क्षेत्रांमधील लोक देखील राज्याच्या राजधानीला तीन भागांमध्ये विभागण्याच्या विरोधात आहेत हे या दुसऱया पदयात्रेतून समोर येणार असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. पोलिसांकडून पदयात्रेला अनुमती नाकारण्यात आल्यावर उच्च न्यायालयाने मंजुरी दिली होती. परंतु न्यायालयाने आयोजकांसमोर पदयात्रेत 600 हून अधिक लोक सहभागी होऊ नयेत अशी अट ठेवली आहे.
उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने 3 मार्च रोजी अमरावतीतील शेतकरी तसेच इतरांकडून दाखल राज्याच्या राजधानीला तीन भागांमध्ये विभागण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱया 75 याचिकांवर निर्णय दिला होता. 2019 मध्ये सत्तेवर आल्यावर वायएसआर काँग्रेसने मागील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारच्या अमरावतीला एकमात्र राजधानी म्हणून विकसित कण्याच्या निर्णयाला रद्द केले होते. जगनमोहन यांच्या सरकारने अमरावती, विशाखापट्टणम अणि कुरनूलला राजधानी म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला होता.