सध्या आग्रा शहराचा कायापालट करण्याचे कार्य स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू आहे. या शहराजवळून वाहणाऱया यमुना नदीच्या तटावर पाण्याची पाईपलाईन बसवत असताना यमुनेच्या पुराणकालिन घाटाचा शोध लागला आहे. या घाटाचे अवशेष सापडले आहेत. हा घाट 500 वर्षांपूर्वी बांधण्यात आला असावा, असे अनुमान आहे. लाल रंगाच्या सँडस्टोनमध्ये याचे बांधकाम झाले आहे. गेल्या शुक्रवारी रात्री येथील आंबेडकर पुलानजीक या घाटाचे अवशेष दिसून आले. त्यानंतर पुरातत्व खात्याने या अवशेषांचे संकलन करून अभ्यास सुरू केला आहे.
हा घाट धार्मिक कार्यांसाठी उपयोगात आणला जात होता. तसेच येथे व्यापारही होत होता. 500 वर्षांपूर्वीच्या काळात रस्त्यांपेक्षा जलमार्गांनेच अधिक व्यापार होत असे. या व्यापारासाठी जलमार्गावर घाट बांधले जात असत. नावांमधून या घाटापर्यंत येऊन वस्तूंची देवाणघेवाण होत असे. 1975 मध्ये यमुना तटावरील रस्त्यांचे रुंदीकरण होत असताना हा घाट लुप्त झाला होता. आता तो पुन्हा सापडल्यामुळे त्याचे पुनरुज्जीवन करण्याची योजना आहे.
सध्या केंद्र सरकारने जलमार्गांना पुन्हा प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने गंगा, यमुना आदी नद्यांचा उपयोग होणार आहे. म्हणून या नद्यांवरील जुने घाट पुनर्रजिवित केले जात आहेत. नव्याने सापडलेल्या या ऐतिहासिक घाटाची सविस्तर माहिती इतिहासतज्ञ राजकिशोर राजे यांनी संकलित केली आहे. असे अनेक घाट सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.