सातारा / प्रतिनिधी :
आजी-माजी परिवहन मंत्र्यांनी राबवलेल्या चुकीच्या धोरणामुळेच एसटी तोट्यात आहे.
एसटीवर असलेले 12 हजार 500 कोटींचे कर्ज चालक, वाहक, तांत्रिक कर्मचाऱ्यांमुळे आहे, की सरकारने जो खासगीकरणाचा पाया बांधलेला आहे त्यामुळे आहे, हे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आम्हाला सांगावे, असे सातारा-स्वारगेट-सातारा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत गायकवाड यांनी म्हटले आहे.
एसटी कामगारांच्या संपाला श्रीकांत गायकवाड यांनी बिनशर्त पाठिंबा दिला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या खासगीकरणामुळे एसटीची दुरावस्था झाली आहे. माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या चुकीच्या धोरणामुळे एसटी तोट्यात आहे. शिवशाहीच्या माध्यमातून जादा तिकीट दर आकारून प्रवाशांकडून लुट सुरू आहे. एसटीबस, हिरकणी व इतर बस चांगल्या करण्यावर लक्ष द्यायला हवे. प्रवासी जो 1 टक्का प्रवासी कर देतोय त्याचा हिशोब कुठे आहे? महाराष्ट्र शासनाच्या 28 योजना आहेत. या योजनांचा पैसा एसटी महामंडळाला मिळतोय का ? तुमच्या धोरणामुळे एसटी महामंडळ तोट्यात आहे.
यावेळी प्रशासनाच्या निषेधार्थ सातारा आगारात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष प्रविण जमदाडे, सेक्रेटरी मोहन चिकणे व चालक, वाहक, कर्मचारी उपस्थित होते.