खासदार विनायक राऊत यांची माहिती : दोन दिवसांत अंतिम निर्णय
पहिले विमान निमंत्रितांसाठी असणार : दहा ऑक्टोबरपासून नियमित प्रवासी वाहतूक प्रवासी वाहतुकीसाठी आणखी काही कंपन्या इच्छुक
प्रतिनिधी / परुळे:
चिपी-परुळे येथे साकारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग विमानतळाला सिंधुदुर्गवासीयांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. हा प्रतिसाद पाहता लवकरच सकाळी किंवा सायंकाळच्या सत्रात एअर इंडियाचे आणखी एक नवीन विमान सुरू करण्याचा प्रयत्न आहे. याबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय होणार आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी दिली.
9 ऑक्टोबर रोजी या विमानतळाचा शुभारंभ होत असून पहिले विमान निमंत्रितांसाठी आहे, तर 10 ऑक्टोबरपासून नियमित प्रवासी वाहतूक सुरू होत आहे. या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी आणखी काही खासगी कंपन्या इच्छुक असून त्या प्रकारचा सर्व्हेही त्यांनी केला आहे.
सिंधुदुर्गवासीयांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत रिझर्व्हेशन फुल्ल झाले असल्याची माहिती राऊत यांनी दिली. शुक्रवारी त्यांनी चिपी विमानतळ येथे आढावा बैठक घेतली व त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
सिंधुदुर्गवासीयांनी चांगल्या कामाला नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. तसाच प्रतिसाद विमान सेवेलाही दिल्यामुळे जिल्हावासीयांचा सन्मान म्हणून आणखी एक विमान मुंबई-सिंधुदुर्गöमुंबई अशी सेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. विमानतळावर कुडाळहून येणारा मुख्य रस्ता पिंगुळी ते पाट रस्त्याचे काम आजपासून झाडे तोडणे व साफसफाई सुरू झाले आहे. रविवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. विमान वाहतूक सुरू होण्यापूर्वी प्राथमिक स्वरुपात कोटिंग करून हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य बनविला जाणार आहे. भविष्यात 40 कोटी खर्च करून हा रस्ता करायचा आहे. काही महिन्यांतच तेही काम सुरू होईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत विमानतळ उद्घाटनापूर्वी पाट-पिंगुळी रस्ता वाहतुकीसाठी योग्यप्रकारे बनविण्यात येईल, असेही राऊत म्हणाले.
विमानतळाला नाव द्यायचे झाले, तर ‘बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग विमानतळ चिपी’, असे असेल. दिल्लीतच नव्हे, तर देशभरात चिपी विमानतळ अशीच ओळख या विमानतळाची झाली आहे. चिपी हा छोटासा गाव आहे. मात्र, त्याची ख्याती जगभरात झाली आहे. उद्घाटनाचा कार्यक्रम केंद्र सरकार व राज्य सरकार हाताळत आहेत. त्यामुळे कोणाकोणाला बोलावणार, याचा अधिकार त्यांना आहे. मात्र, माजी खासदार, कर्नल सुधीर सावंत यांना आपण निमंत्रित करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आढावा बैठकीला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक व शासनाचे अधिकारी तसेच चिपी सरपंच गणेश तारी, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, सचिन वालावलकर, संजय भोगटे, जयभारत पालव, अतुल बंगे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.