आंदोलक शेतकऱयांना केंद्राचे आश्वासन : शेतकऱयांकडून रस्ते बंद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शेतकऱयांना धान्यांसाठी दिल्या जाणाऱया किमान आधारभूत किमतीच्या पद्धतीत कोणतेही परिवर्तन होणार नाही, असे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱया शेतकऱयांच्या नेत्यांशी केल्या जात असलेल्या चर्चेच्या दुसऱया फेरीत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. नवे कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीवर शेतकरी ठाम असल्याचे सांगण्यात आले. चर्चेची ही फेरीही अनिर्णित राहिली असून पुढची चर्चा 5 डिसेंबरला होणार आहे.
गुरुवारी दुसऱया फेरीत केंद्रीय अर्थमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सरकारची बाजू शेतकऱयांसमोर मांडली. शेतकऱयांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी केंद्राचे प्रयत्न आहेत. नवे कायदे त्यासाठीच आणण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत किमान आधारभूत किंमत शेतकऱयाला मिळेल अशी व्यवस्था सरकार करणार आहे. तसेच सरकारकडून केल्या जाणाऱया धान्य खरेदीतही व्यत्यय येणार नाही, असे त्यांनी आंदोलक नेत्यांना सांगितल्याचे समजते.
ही चर्चा रात्री उशीरापर्यंत सुरू राहिली. मात्र सहा तासांच्या चर्चेनंतरही तोडगा निघाला नाही. त्यामुळे पुढील बोलणी आणखी 2 दिवसांनी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लवकरात लवकर तोडगा काढा, असा आग्रह शेतकऱयांनी धरला आहे. तर केंद्र सरकारही नव्या कायद्यांवर ठाम असल्याचे दिसत आहे.
जेवण नाकारले
चर्चेची ही फेरी येथील विज्ञान भवनात सुरू आहे. शेतकरी नेत्यांसाठी सरकारने येथे जेवणाची व्यवस्था केली होती. तथापि, त्यांनी सरकारी जेवण नाकारून स्वतःबरोबर आणलेले भोजनच घेतले, अशी माहिती देण्यात आली. सरकारने दिलेला समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव 1 डिसेंबरच्या चर्चेत फेटाळण्यात आला.
सरकारचे आवाहन
नवे कृषी कायदे पूर्णतः मागे घेण्यास सरकारने नकार दिला आहे. मात्र प्रत्येक कायद्यातील शेतकऱयांचा आक्षेप असणाऱया मुद्दय़ांवर सविस्तर चर्चा केली जाईल, असे स्पष्ट केले होते. किमान आधारभूत किंमत पद्धती रद्द केली जाईल, अशी चिंता शेतकऱयांना वाटते. तथापि, ती अनाठायी आहे. उलट या कायद्यांमुळे शेतकऱयांना कोणत्याही बाजारपेठेत आपला माल विकण्याची संधी प्राप्त झाली आहे. सरकारी धान्य खरेदीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळै शेतकऱयांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन सरकारने केले आहे.
रस्ते अडवले
दिल्ली सीमेवर शेतकऱयांनी उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब येथून दिल्लीकडे जाणारे रस्ते अडवले आहेत. यामुळे दिल्लीत वाहतूक कोंडी झाली आहे. नागरिकांना दिल्लीबाहेर पडणे अशक्य झाले आहे. दिल्ली सरकारने सकाळी काही प्रमाणात वाहतूक खुली करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, दुपारनंतर पुन्हा रस्ते अडवले गेल्याने नागरिकांमध्ये नाराजीची भावना असल्याचे सांगण्यात आले.