नागरिकांसह वाहनचालकांची गैरसोय
प्रतिनिधी /बेळगाव
आनंदनगरसह उपनगरांतील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. आनंदनगरला जोडणाऱया प्रमुख रस्त्यांची चाळण झाली असून, वाहनधारकांना खड्डेमय रस्त्यावरूनच ये-जा करावी लागत आहे. संपूर्ण रस्ता खराब झाल्याने वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
आनंदनगर परिसरातील समस्यांचे निवारण करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून दुजाभाव केला जातो. परिसरातील रस्त्यांची बांधणी, गटारी आणि डेनेज समस्या अशा नागरी सुविधांसाठी देखील प्रत्येक गल्लीतील रहिवाशांना झगडावे लागत आहे. आनंदनगर परिसरातील काही अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. पण गटारीचे बांधकाम झाले नाही. तसेच येळ्ळूररोड कॉर्नर ते अनगोळला जोडणाऱया संपर्क रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. येळ्ळूररोड कॉर्नरवर रस्ता पूर्णपणे उखडला असून, वाहनधारकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. रस्त्याचा विकास करण्याच्यादृष्टीने येथील काम सुरू करण्यात आले होते. त्याकरिता ठिकठिकाणी डेनेज चेंबरची उंची देखील वाढविण्यात आली होती. पण रस्त्याचा विकास अद्यापही झाला नाही. त्यामुळे वाहनधारकांना हे चेंबर धोकादायक ठरत आहे. चेंबर असल्याचे रात्रीच्यावेळी निदर्शनास येत नसल्याने अपघात घडत आहेत.
येळ्ळूर रोडवरून आनंदनगरकडे प्रवेश करताना दगडांमधूनच वाहनधारकांना जावे लागत असल्याने वाहने घसरून पडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या रस्त्याचा विकास कधी होणार असा मुद्दा उपस्थित झाला आहे.