सरबजीत कौर यांची निवड : 14 मते मिळाली : ‘आप’कडून विरोध
वृत्तसंस्था / चंदीगड
चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. सरबजीत कौर नव्या महापौर म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांना 14 मते मिळाली आणि विजयाची घोषणा होताच खासदार किरण खेर यांनी त्यांना महापौरपदाच्या खूर्चीवर बसविले आहे. तर भाजपच्या या विजयाच्या विरोधात आम आदमी पक्षाने जोरदार गोंधळ घातला आहे. या निवडणुकीत आप उमेदवाराला 13 मते मिळाली, तर एक मत अमान्य घोषित करण्यात आले.
शनिवारी सकाळी 11 वाजता महापालिका सभागृहात निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती. सर्वप्रथम खासदार किरण खेर यांनी मतदान केले, परंतु त्यांच्या मतदानाला आम आदमी पक्षाने विरोध केला. महापौर, वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौर निवडले गेले आहेत. तर नवा महापौर मिळताच शहरात मागली 15 दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीला विराम मिळाला आहे.
भाजप-आपकडे प्रत्येकी 14 मते होती. खासदार किरण खेर यांचे मत आणि हरप्रीत कौर बबला यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने भाजपकडे 14 मतांचे संख्याबळ झाले होते. काँग्रेस आणि अकाली दलाने निवडणुकीत भाग घेण्यास नकार दिला होता. 1 जानेवारी रोजी सर्व नव्या 35 नगरसेवकांनी शपथ घेतली होती. महापौर निवडणुकीनंतर ‘आप’च्या नगरसेवकांनी सभागृहात धरणे आंदोलन चालविले आहे.
आम आदमी पक्षाने महापौर पदासाठी अंजू कत्याल, वरिष्ठ उपमहापौरपदासाठी प्रेम लता आणि उपमहापौर पदासाठी रामचंद्र यादव यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपच्या वतीने महापौरपदासाठी माजी नगरसेवक जगतार सिंह जग्गा यांच्या पत्नी सरबजीत कौर, वरिष्ठ महापौरपदासाठी दलीप शर्मा, उपमहापौरपदासाठी अनूप गुप्ता यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दोन्ही पक्षांनी परस्परांवर घोडेबाजाराचा आरोप केला होता.
महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने पहिल्यांदाच भाग घेत सर्वात मोठा पक्ष ठरण्याची कामगिरी केली होती. ‘आप’चे 14, भाजपचे 12 तर काँग्रेसचे 8 आणि शिरोमणी अकाली दलाचा एक नगरसेवक निवडून आला होता. काँग्रेसने देवेंद्रसिंह बबला यांची हकालपट्टी केल्याने त्यांनी स्वतःची पत्नी नगरसेविका हरप्रीत कौर बबला यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे काँग्रेसचे केवळ 7 उरले.
तिन्ही पक्षांकडून खबरदारी
निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर तिन्ही पक्षांना नगरसेवकांना पळविण्यात येण्याची भीती सतावू लागली होती. याचमुळे तिन्ही पक्षांनी स्वतःच्या नगरसेवकांना सुरक्षित ठेवण्याचे पाऊल उचलले होते. भाजपने स्वतःच्या 13 नगरसेवकांना कसौली आणि त्यानंतर शिमल्यात हलविले होते. काँग्रेसच्या नगरसेवकांना जयपूर येथे हलविण्यात आले. आम आदमी पक्षाने नगरसेवकांना सीसीटीव्हीच्या देखरेखीत ठेवले होते.