आमदार राणेंवरील टिकेला भाजपचे राज्य परिषद सदस्य सुरेश सावंत यांचे प्रत्युत्तर
वार्ताहर / कणकवली:
विधानसभा निवडणूक झाल्यावर विधान परिषदेत घेण्याचे पक्षाने दिलेले आश्वासन न पाळल्याने जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे आमदारकीचे स्वप्नभंग झाले आहे. त्यामुळे सावंत हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. एकिकडे परतीच्या पक्षिय प्रवासाची चर्चा करायची व दुसरीकडे आमदार नीतेश राणे यांच्यावर टीका करायची, हे सावंत यांचे गुपित येथील जनतेला समजले आहे, असा टोला भाजपचे राज्य परिषदेचे सदस्य सुरेश सावंत यांनी लगावला आहे.
आमदार नीतेश राणे यांच्यावर केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना प्रसिद्धी पत्रकात सावंत यांनी म्हटले आहे, शिवसेनेने आमदारकीचा दिलेला शब्द पाळला नसल्याने स्वप्नभंग झाल्याने सावंत यांनी राणे यांच्यावर राग काढण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार बनविणे हे काम फक्त नारायण राणेच करू शकतात. सावंत हे कोरोना व्हायरसपेक्षा नीतेश राणे यांना अधिक घाबरलेले दिसतात. त्यांनी राणेंसोबत राहून अनेक पदे उपभोगून नंतर शिवसेनेत प्रवेश केला.
शेतकऱयांनी 120 रुपये प्रतीकिलो दर आल्याशिवाय काजू विक्री करू नये, असे सावंत यांनी दोन महिन्यांपूर्वी सांगितले होते. सध्या काजू बीचा दर 80 रुपये किलो आहे. हजारो टन काजू शेतकऱयांच्या घरात पडून आहे. शेतकरी मिरगाचा पाऊस पडण्यापूर्वी बाजार करतो. त्यामुळे शेतकऱयांच्या या नुकसानीला जबाबदार कोण?, असे सुरेश सावंत यांनी म्हटले आहे.
ते म्हणतात, जिल्हा बँकेत गोरगरीब शेतकरी आपला पैसा ठेवतो, बचत करतो, त्यातून तुम्ही कर्ज देता. नफा कमवता व स्वत:ची पाठ थोपटून घेता. कोरोनाच्या संकटात जिल्हा बँक गरिबांसाठी काय करते? सतीश सावंत यांना खरोखरच गरिबांची काळजी असेल, तर त्यांनी जिल्हा बँकेच्या खातेदाराच्या नावे बिनव्याजी 25000 रुपयांचे कर्ज जमा करावे. रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार कोरोनाच्या कालावधीत कोणत्याही बँकेने थकीत कर्ज वसुली करू नये, असा आदेश असताना जिल्हा बँक कर्ज वसुलीचा तगादा लावत आहे. या बँकेचा कर्जावर व्याजदर 12 ते 14 टक्क्यांपर्यंत आहे. या उलट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र या दोन्ही बँकांचा व्याजदर 8 ते 9 टक्के आहे. शेतकऱयांची काळजी असेल, तर या शेतकऱयांना 8 ते 9 टक्के दराने कर्ज द्यावे अन्यथा राजीनामा देऊन घरी बसावे.
कोरोनाच्या लढय़ात शासन व प्रशासन कमी पडत असल्यानेच राणे यांनी जिल्हय़ातील डॉक्टर, सरपंचांना पीपीई किट वाटप केले. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या गोळ्य़ांचेही वाटप करणार आहेत, असेही सावंत यांनी म्हटले आहे.