आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर : टीकांकडे लक्ष देणार नाही
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाची दुसरी लाट तीव्र झाल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी काही दिवसांकरिता राज्यात कठोर नियम जारी केले आहेत. तसेच एखाद्याला खूश करण्यासाठी कठोर नियम बदलण्याचा प्रश्नच नाही. आम्हाला राज्यातील जनतेचे आरोग्य महत्त्वाचे असून कोणीही केलेल्या टीकांकडे लक्ष देणार नाही, असे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले. बेंगळुरात ते पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री सुधाकर पुढे म्हणाले, काहींना मी खलनायक असल्याचे वाटत आहे. पण राज्यातील लोकांची आरोग्य सेवा माझ्यासाठी महत्त्वाची आहे. निस्वःर्थपणे मी काम करीत असून एखाद्याला खूश करण्यासाठी नियमात शिथिलता आणली जाणार नाही. कन्नड चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि शिष्टमंडळाने मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची भेट घेतल्याने सरकारने नियमात किंचित बदल केला आहे. पण 7 एप्रिलनंतर 50 टक्के प्रेक्षक प्रवेशाची अट कायम राहणार आहे. त्यानुसार सर्वांनाच नियमात शिथिलता दिली जणार नाही. शिक्षण संस्थांकडूनही शिथिलतेसाठी दबाव आला आहे. पण नियमात बदल करणे शक्य नाही, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील जनतेचे आरोग्य महत्त्वाचे असल्याने कोणत्याही टीकांकडे लक्ष न देता जनतेचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपण प्राधान्य देत आहे. आता कठोर नियम जारी न केल्यास पुढील दिवसात मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागेल. महाराष्ट्रात शनिवारी एकाच दिवशी तब्बल 50 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 500 पेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे. राज्यातही अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कठोर नियम जारी करणे अनिवार्य आहे, असे त्यांनी सांगितले.
आतापर्यंत 45 लाख लसीकरण
महाराष्ट्रातील परिस्थिती पाहून राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करावे. केंद्र सरकारनेही नियमांचे पालन करण्याची सूचना केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱयांना दंड घालणे गरजेचे आहे. राज्यात आतापर्यंत 45 लाख नागरिकांना लसीकरण देण्यात आले असून शनिवारी एकाच दिवशी दोन लाख 90 हजार जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे, असेही मंत्री सुधाकर म्हणाले.