प्रतिनिधी / कणकवली:
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून वर्षाला 6 हजार रुपये तीन हप्त्यात थेट बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, आयकर भरणाऱयांसाठी ही योजना नसल्याने तालुक्यातून आयकर भरणाऱयांपैकी 358 जणांना या योजनेचा लाभ मिळाला असल्याचे पुढे आले आहे. संबंधितांना महसूल विभागाकडून नोटिसा काढण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिली.
आयकर न भरणाऱया शेतकऱयांना वार्षिक सहा हजार रुपये निधी या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून जमा होतो. पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन हप्त्यामध्ये ही रक्कम जमा केली जाते. मात्र, काही लाभार्थ्यांनी आयकर भरत असतानाही या योजनेसाठी पात्र असल्याबाबतचे पुरावे देत लाभही घेतला.
दरम्यान, शासनाकडून याबाबतची पडताळणी सुरू करण्यात आली होती. यात तालुक्यात 358 जणांनी आयकर भरत असतानाही या योजनेचा लाभ घेतला असल्याचे निष्पन्न झाले आहे. महसूल विभागाकडून त्यांना नोटिसा काढून त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्यात येणार आहे. याबाबत नोटिसा काढण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच स्वत: ऑनलाईन अर्ज केलेले 18 लाभार्थी असून तेही अपात्र आहेत. त्यांनाही नोटिसा काढण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.