विस्तीर्ण जागेत प्रीमियम आयटी पार्क उभारणार
वृत्तसंस्था/ मुंबई
टाटा समूहाची कंपनी टाटा रिऍल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर यांनी नवी मुंबईमध्ये एक महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रीमियम आयटी पार्क प्रकल्पाच्या योजनेकरिता कंपनीने 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे.
पुढील आठ वर्षाच्या कार्यकाळामध्ये टप्प्याटप्प्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम टाटा रिऍल्टीकडून हाती घेतले जाणार आहे, असे टाटा समूहाकडून सांगण्यात आले. 70 लाख चौरस फूट क्षेत्रफळावर सदरची नवी आयटी पार्क योजना कार्यान्वीत केली जाणार आहे. त्यासंदर्भातील योजनेचा आराखडा आखण्यात आला आहे. सदरच्या प्रकल्पासाठी ब्रिटनमधील गुंतवणूक फर्म
ऍक्टीसची मदत घेतली जाणार असल्याचेही टाटा समूहाकडून सांगण्यात आले.
सर्वात मोठी गुंतवणूक
नवी मुंबईजवळ घनसोळी येथे 47 एकर जमीन कंपनीची आहे त्या ठिकाणी सदरचा नवा आयटी पार्कचा प्रकल्प साकारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर या ठिकाणी अंदाजे 70 हजाराहून अधिक लोकांना रोजगार मिळू शकणार आहे, असे टाटा समूहाने म्हटले आहे. आजवरची ही सर्वात मोठी गुंतवणूक असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.