डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिकांचा सल्ला
वृत्तसंस्था / झ्यूरिच
जगात सद्यकाळात लोककेंद्रीत आरोग्य व्यवस्थेची गरज आहे. सर्व देशांनी याकरता अधिकाधिक गुंतवणूक करावी असे उद्गार जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी जागतिक आयुर्वेद महोत्सवात बोलताना काढले आहेत.
लोकांमध्ये आरोग्यसंबंधी जागरुकता वाढविण्याची गरज आहे. यामुळे लोक वेळीच स्वतःच्या आजारांविषयी जागरुक होतील आणि उपचार करवू शकतील. आरोग्यसुविधांमध्ये वृद्धी झाल्याने सर्वसामान्य माणूस त्याचा लाभ घेऊ शकणार आहे. आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी याकरता स्वतःचे मत मांडू शकेल. देशांनी याकरता संशोधन कार्यांमधील गुंतवणूक वाढविणे आणि साधनसामग्रीचा विकास करण्याची गरज असल्याचे स्वामिनाथन म्हणाल्या.
आयुर्वेद आणि अन्य वैद्यकीय पद्धतींना कमी लेखण्याची मानसिकता तयार झाली आहे. या मानसिकतेतून आम्हाला बाहेर पडावे लागणार आहे. प्रत्यक्षत आयुर्वेद आणि अन्य पारंपरिक वैद्यकीय पद्धती आजारांशी लढण्यास मोठी मदत करतात. याचमुळे आधुनिक औषधे आणि पांरपरिक उपचारात कधीच तुलना करू नये. दोघांच्या वापराने लोकांना लाभ पोहोचविण्याचे धोरण अवलंबिले जावे असे स्वामिनाथन यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी या महोत्सवाचे व्हर्च्युअल उद्घाटन केले होते. हा महोत्सव 19 मार्चपर्यंत चालणार आहे. या महोत्सवात 35 विदेशी तज्ञ आणि संशोधक तसेच 150 हून अधिक भारतीय वैज्ञानिक आयुर्वेदावर स्वतःचे विचार मांडणार आहेत. सद्यकाळात आयुर्वेदाच्या वापराच्या व्यवहार्यतेविषयी सांगणार आहेत.