माणसाइतका स्वार्थी प्राणी जगात अन्य कोणी नाही, हे खरेच आहे. आपली पैशाची कधीही न संपणारी भूक भागविण्यासाठी तो निसर्गाला अक्षरशः ओरबाडतो. त्याच्यावर अत्याचार करतो. हे करत असताना आपण बसलेली फांदी कधी तोडायची नसते हे भानही त्याला रहात नाही. तथापि, उत्तराखंड राज्यातील एका व्यक्तीच्या जीवनात अशी घटना घडली आहे की त्याच्या निसर्गविनाशी मानसिकतेत आता पूर्णतः परिवर्तन घडले आहे.
सर्वांना माहितच आहे की सध्या उत्तराखंडमधील चमोली येथे हिमखंड कोसळल्याने जलप्रलय निर्माण झाला असून अनेक लोकांना जीव गमवावा लागला. या प्रलयातून एका झाडाच्या साहाय्याने विक्रम चौहान नामक एका व्यक्तीने स्वतःचा प्राण वाचविला. डोंगरमाथे कापणे, खाणी खोदणे, झाडे तोडणे, जमिनीतून दगड काढणे अशी कामे करण्याची कंत्राटे हे चौहान घेतात. एकंदर, निसर्गाचा विनाश करणे हाच त्यांच्या पोटापाण्याचा व्यवसाय आहे.
चमोली येथे काही दिवसांपूर्वी प्रचंड हिमखंड कोसळल्याने ऋषीगंगा नदीला अचानक महापूर आला. या नदीवर धरण बांधून वीज निर्मिती केली जाणार होती. त्यासाठी बोगद्याचे काम सुरू होते. हे काम करणाऱया कंत्राटदारांपैकी एक चौहान हे आहेत. ते नेहमीप्रमाणे यंत्रसामग्रीच्या साहाय्याने आपल्या कर्मचारीवर्गासह बोगद्याचे काम करीत होते. नदीपात्रातून वाळू काढून बाजूचा खड्डा भरत असताना अचानक नदीचे पाणी प्रचंड वाढले. बर्फासारख्या थंड असलेल्या त्या पाण्यात ते वाहूनच जात होते. पण त्यांनी जवळच्याच एका झाडाला घट्ट मिठी मारली. पुढचा पूर्ण अर्धा तास ते झाडाला चिकटलेल्या अवस्थेत होते. तोपर्यंत साहाय्यता पथक आणि गावकरी त्यांच्यापर्यंत पोहचले. काही ग्रामस्थांनी त्यांची सुटका केली. थंड पाण्यामुळे ते अक्षरशः लटलट कापत होते. पण ग्रामस्थांना या थंडीवरचा उपाय माहीत होता. त्यांनी त्यांना जवळच्याच नैसर्गिक उष्ण झऱयाच्या पाण्यात बसवले. त्यामुळे त्यांच्या अंगातील थंडी पळाली. (याचा अर्थ पुन्हा निसर्गच साहाय्याला धावून आला). नंतर साहाय्यता पथकाच्या लोकांनी त्यांना रूग्णालयात नेले.
त्यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. पण त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. आज त्यांना आपल्या व्यवसायाचा पश्चात्ताप होत आहे. आयुष्यभर आणि पैशासाठी निसर्गावर अत्याचार केले. पण अखेर निसर्गानेच आपला जीव वाचवला. परमेश्वर कृपेनेच हे घडले. निसर्गमाता काहीवेळा कोपते. पण शेवटी तीच तारतेही. आपण आपल्या स्वार्थासाठी या मातेचा विश्वासघात करता कामा नये, असे ते आज म्हणतात. आपल्या सर्वांनाच या घटनेपासून बरेच शिकता येईल, नाही का ?