प्रशासनाला उशिराने आली जाग
प्रतिनिधी /बेळगाव
आरपीडी चौक येथे खराब झालेल्या चेंबरमधून सांडपाणी वाहून रस्त्यावर येत होते. वाहनांच्या ये-जा करण्याने हे पाणी नागरिकांच्या अंगावर उडत असल्याने नाराजी व्यक्त होत होती. अनेकवेळा मागणी झाल्यानंतर येथे नव्याने चेंबरचे बांधकाम करण्यात आले आहे.
नेहमीच वर्दळ असणाऱया आरपीडी चौक येथे सांडपाणी साचत होते. पावसात हे सांडपाणी थेट रस्त्यावर येऊन परिसरात दुर्गंधी पसरत होती. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खराब चेंबरच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने रहिवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता.
उशिरा का होईना पण प्रशासनाला शहाणपण सुचले आणि दोन दिवसांपासून या चेंबरच्या दुरुस्तीला सुरुवात झाली. सध्या याचे बांधकाम पूर्ण झाले असून बाजूने बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. चेंबर बांधल्याने परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.