वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ढाक्यामध्ये होणाऱया आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य व गुणवत्ता दाखवून राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्याचा दावा करण्यासाठी चांगले व्यासपीठ मिळाले आहे, असे प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगने केले आहे. मंगळवापासून सुरू होणाऱया या स्पर्धेसाठी भारतीय संघ शुक्रवारी ढाक्याला रवाना झाला.
गेल्या वर्षी होणारी ही स्पर्धा कोरोना महामारीमुळे अनेकदा लांबणीवर टाकण्यात आली होती. आता ही स्पर्धा 14 ते 22 डिसेंबर या कालावधीत बांगलादेशमध्ये होणार आहे. यावर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने ऐतिहासिक कांस्य जिंकले होते. त्यानंतर भारताची ही पहिलीच स्पर्धा आहे. मनप्रीतच्या नेतृत्वाखालील या संघात टोकियोत सहभागी झालेल्या आठ खेळाडूंचा समावेश नाही. त्यात अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेशचाही समावेश आहे. त्याला या स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. ‘जवळपास दहा खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपली गुणवत्ता व क्षमता दाखविण्यासाठी धडपडणाऱया खेळाडूंना ही नामी संधी मिळाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना चांगले व्यासपीठ मिळाले आहे,’ असे ढाक्याला प्रयाण करण्यापूर्वी मनप्रीत म्हणाला.
विद्यमान विजेत्या भारताची सलामीची लढत पहिल्याच दिवशी कोरियाविरुद्ध होणार असून त्यानंतर जपान, मलेशिया, पाकिस्तान व यजमान बांगलादेशविरुद्ध सामने होणार आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा व पुढील वर्षी आशिया चषक स्पर्धा होणार असल्याने आशियातील संघांची ताकद आजमावून पाहण्याची संधीही या स्पर्धेतून मिळणार असल्याचे मनप्रीत म्हणाला. 15 डिसेंबरला बांगलादेश, 17 डिसेंबरला पाकिस्तान, 18 डिसेंबरला मलेशिया, 19 डिसेंबरला जपानविरुद्ध भारताचे उर्वरित सामने होणार आहेत. प्राथमिक फेरीनंतर पहिले चार क्रमांक मिळविणारे संघ उपांत्य फेरीत खेळतील. उपांत्य लढती 21 रोजी तर अंतिम लढत 22 डिसेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी 2018 मध्ये मस्कतमध्ये झालेल्या स्पर्धेत मुसळधार पावसामुळे अंतिम लढत होऊ शकली नव्हती, त्यामुळे भारत व पाकिस्तान यांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले होते.