वृत्तसंस्था/ दोहा
आशियाई सांघिक पुरुष आणि महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या पुरुष संघाला कांस्यपदावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीच्या लढतीत दक्षिण कोरियाने भारताचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला.
या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत इराणचा 3-1 असा पराभव करून आपले पदक निश्चित केले होते. त्यानंतर उपांत्य फेरीत पराभव पत्करणाऱया दोन्ही संघांना कांस्यपदक दिले जाते. शुक्रवारी उपांत्य लढतीत दक्षिण कोरियाने दर्जेदार आणि अचूक खेळाचे दर्शन घडवित भारतीय पुरुष संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या लढतीत भारतीय स्पर्धकांना एकही विजय मिळविता आला नाही. पहिल्या सामन्यात कोरियाच्या बाराव्या मानांकित जेंगने भारताच्या जी. साथियानवर 11-5, 10-12, 11-8, 11-5 अशी मात करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱया एकेरीत दक्षिण कोरियाच्या ली सेंगसू याने शरथ कमलचे आव्हान 7-11, 15-13, 11-8, 11-6, 11-9 अशा गेम्समध्ये संपुष्टात आणत आपल्या संघाची आघाडी वाढविली. तिसऱया सामन्यात दक्षिण कोरियाच्या सेंगमीन चोने भारताच्या हरमित देसाईचा 11-4, 9-11, 8-11, 11-6, 13-11 असा पराभव करत भारताचे उपांत्य फेरीतील आव्हान संपुष्टात आणले.
महिलांच्या विभागात भारताने थायलंडचा 3-1 अशा फरकाने पराभव करत पाचवे स्थान मिळविले. या लढतीत भारतातर्फे सुतीर्था मुखर्जी, अर्चना कामत यांनी शानदार खेळ केला. पहिल्या एकेरी सामन्यात भारताच्या एस. मुखर्जीने केवळ 18 मिनिटांत थायलंडच्या पी. पिनोपिसेनचा 11-5, 11-5, 11-6 असा पराभव केला. दुसऱया एकेरी सामन्यात भारताच्या अर्चना कामतला थायलंडच्या एस. सुतासेनीने 11-7, 7-11, 11-6, 10-12, 11-9 असे हरविले. परतीच्या एकेरी सामन्यात भारताच्या श्रीजा अकुलाने थायलंडच्या विराकम तायापिटकवर 11-7, 11-6, 11-2, त्याचप्रमाणे मुखर्जीने थायलंडच्या सवेताबटचा 11-7, 11-6, 10-12, 11-7 असा पराभव करत या स्पर्धेत पाचवे स्थान मिळविले.