वृत्तसंस्था/ गुवाहाटी
येथे सुरु असलेल्या रणजी चषक स्पर्धेत क गटातील सामन्यात यजमान आसामने महाराष्ट्राला 175 धावांवर गुंडाळले. यानंतर, आसामने सावध सुरुवात करताना पहिल्या दिवसअखेरीस 29 षटकांत 1 बाद 77 धावा जमवल्या होत्या. आसाम संघ अद्याप 98 धावांनी पिछाडीवर असून दिवसअखेरीस शुभम मंडल 31 व रिषव दास 33 धावांवर खेळत होते.
प्रारंभी, आसामने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. कर्णधार गोकुल शर्माचा हा निर्णय सार्थ ठरवताना आसामच्या गोलंदाजांनी महाराष्ट्राला पहिल्या डावात 175 धावांवर गुंडाळले. कर्णधार अंकित बावणेने अर्धशतकी खेळी साकारताना 94 चेंडूत 75 धावा केल्या. स्वप्नील गुगळेने 25 तर स्वप्नील बच्छावने 40 धावांचे योगदान दिले. हे तीन फलंदाज वगळता इतर फलंदाजांनी निराशा केली. आसामकडून अनुप दास व अनुज माळी यांनी प्रत्येकी 4 तर मुख्तार हसनने 2 गडी बाद केले.
आसामने पहिल्या डावात सावध सुरुवात करत दिवसअखेरीस 29 षटकांत 1 बाद 77 धावा केल्या होत्या. दिवसअखेरीस शुभम मंडळ 3 चौकारासह 31 तर रिषव दास 4 चौकारासह 33 धावांवर खेळत होते. सलामीवीर राहुल हजारिका 6 धावा काढून बाद झाला.
संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र पहिला डाव 43.4 षटकांत सर्वबाद 175 (स्वप्नील गुगळे 25, अंकित बावणे 75, बच्छाव 40, दास 4/66, रणजीत माळी 4/55).
आसाम 29 षटकांत 1 बाद 77 (मंडळ खेळत आहे 31, हजारिका 6, दास खेळत आहे 33, मुकेश चौधरी 1/31).
आकाशदीप नाथचे नाबाद शतक, उत्तर प्रदेश 4/281
मुंबई : रणजी चषक स्पर्धेत मुंबईविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात आकाशदीप नाथचे नाबाद शतक व रिंकु सिंगचे अर्धशतक यांच्या जोरावर उ.प्रदेशने पहिल्या दिवशी 86 षटकांत 4 बाद 281 धावा जमवल्या. आकाशदीपने नाबाद 115 धावा फटकावल्या. दासने 71 धावांचे योगदान दिले. मुंबईकडून आकाश पारकर व रोस्टन दासने प्रत्येकी 2 गडय़ांना तंबूत पाठवले.