हवामान विभाग : देशभरात उष्णतेची लाट : नागरिक त्रस्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उष्णतेचा प्रकोप वाढल्याने देशातील अनेक भागांमध्ये नागरिक त्रस्त झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने उष्णतेची लाट पाहता लोकांना दुपारच्या वेळेस घरातच राहण्याची सूचना केली आहे. आगामी 2-3 दिवस या उष्णतेपासून दिलासा मिळणार नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. परंतु आसाम, मेघालयात 26 -28 मे या कालावधीत अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करत हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. 28 मेनंतर उत्तर-मध्य भारतातील तापमान काही प्रमाणात कमी होऊ शकते.
राष्ट्रीय राजधानीत काही ठिकाणी तापमान 47 अंशांवर पोहोचले आहे. पुढील दोन दिवसांपर्यंत दिल्लीत अशीच स्थिती राहण्याचा अनुमान आहे. 28 मेच्या रात्रीपासून वादळी वारे आणि पावसास प्रारंभ होऊन तापमान 35-38 अंश सेल्सिअसपर्यंत खालावू शकते.
पावसाची आतुरतेने प्रतीक्षा
28 मेपासून उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळण्याचा अनुमान आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये 29 आणि 30 मे रोजी वादळी वारे वाहू शकतात. स्कायमेटनुसार पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेशात उत्तर मैदानी भागांमध्ये पाऊस आणि धूळयुक्त वाऱयांमुळे दिलासा मिळू शकतो.
उर्वरित देशातील पावसाची स्थिती
पुढील 5 दिवसांमध्ये आसाम आणि मेघालयाच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. अरुणाचल प्रदेशचा काही भाग, सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पाऊस पडण्याचा अनुमान आहे.
5 दिवसांसाठी रेड वॉर्निंग
दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड समवेत अनेक राज्यांसाठी हवामान विभागाने ‘रेड’ वॉर्निंग दिला आहे. पुढील 5 दिवस हे भाग तीव्र उष्णतेच्या लाटेला सामोरे जाऊ शकतात. काही ठिकाणी तापमान 47 अंशांवर पोहोचण्याची शक्यता आहे.