वकिलांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कमी असताना देशात मात्र पेट्रोल, डिझेल आणि सिलिंडर गॅसचे दर गगनाला भिडत चालले आहेत. जीवनाश्यक वस्तूंचे दर वाढत असल्याने सर्वसामान्य जनतेला महागाईचे चटके बसू लागले आहेत. गरीब व मध्यमवर्गीय जनतेला जीवन जगणे मेटाकुटीचे बनले आहे. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य जनतेचा विचार करून इंधनाचे वाढत असलेले दर आणि सिलिंडरचे दर तातडीने कमी करावेत, अशी मागणी बेळगाव येथील वकिलांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
घरगुती गॅस सिलिंडरचे दर पुन्हा वाढविण्यात आले. 340 रुपये असलेला दर आता 1000 रुपये झाला आहे, तरीदेखील सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. मात्र, यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा त्रास होत आहे. अनेक कुटुंबांना उपाशीपोटी राहावे लागत आहे. महागाईवर केंद्र सरकारचे कोणतेच नियंत्रण नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता यामध्ये भरडली जात आहे. तेव्हा तातडीने हे दर कमी करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
स्मार्ट सिटीची कामे निकृष्ट दर्जाची
स्मार्ट सिटीची कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. याचबरोबर ही कामे संथगतीने सुरू आहेत. गेल्या पाच वर्षांपासून कामांना सुरुवात झाली आहे. मात्र, अजून ही कामे पूर्ण झाली नाहीत. या कामांचा दर्जा पाहता आणखी दोन ते चार वर्षांमध्ये पुन्हा अशीच योजना राबवावी लागणार आहे. करोडो रुपयांचा निधी वाय गेला आहे. तेव्हा स्मार्ट सिटीच्या कामाची पूर्ण चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ऍड. अण्णासाहेब घोरपडे, ऍड. वाय. के. दिवटे, ऍड. सुभाष मोदगेकर, ऍड. बी. पी. जेवणी, ऍड. आर. एन. नलवडे, ऍड. एम. बी. बोंदे, ऍड. मोहन नंदी, ऍड. शरद देसाई, ऍड. सदानंद ओसाप्पाचे, ऍड. संजीव कामत, ऍड. बसय्या हिरेमठ, ऍड. परशराम भंडारी, ऍड. जी. डी. भाविकट्टी, ऍड. एम. आर. यरझरवी, ऍड. मारुती कामाण्णाचे, ऍड. प्रवीण रंगोळे, ऍड. रेखा एम., ऍड. मंजुळा के., शेतकरी सुभाष मरूचे, ऍड. श्रीधर गुरव, अशोक कलबुर्गी, विजय भोसले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.