श्रीकृष्णाला शरण आलेल्या माहेश्वर ज्वराने त्याला वाचविण्याची श्रीकृष्णाला हात जोडून विनंती केली. त्यावर भगवान म्हणाले –
हरि म्हणे रे महाक्रूरा । त्रिशिरानामक रौद्रज्वरा ।
तुझी ऐकूनि स्तवनगिरा । प्रसन्न झालों ये काळीं ।
माझे आज्ञेचें पाळण । करूनि स्वेच्छा वर्तें पूर्ण ।
आज्ञापालक तुज देखून । न करी विघ्न मम ज्वर ।
म्यां तुज दीधलें पूर्ण अभय । यावरी मम ज्वर न करी भय । आज्ञा पाळूनि लोकत्रय । विचरें निर्भय होत्साता । कोणती आज्ञा ऐसें पुससी । तरी ऐकावें इयेविषीं । तुझा आमुचा जे इतिहासीं। संवाद झाला जो आतां । तया इतिहासाचें श्रवण। अथवा हृदयीं करील स्मरण । तयासी भय तुजपासून । सहसा जाण न व्हावें । जेंवि तूं झालासि मत्पदशरण। तैसें देखूनि प्रणत जन । त्यांतें संताप देखून । आज्ञापाळण हें कीजे । ऐशिया ऐकूनि श्रीकृष्णबोला । रौद्रज्वर निर्भय झाला । पुढें वृत्तान्त जो वर्तला । तो भूपाळा अवधारिं ।
श्रीभगवान म्हणाले- हे त्रिशिरा ! मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता माझ्या या ज्वरापासूनचे तुला वाटणारे भय दूर होवो. जगात जो कोणी आम्हा दोघांच्या या संवादाचे स्मरण करील, त्याला तुझ्यापासून काहीही भय राहणार नाही.
कृष्णें आज्ञापिला ज्वर । करूनि अच्युता नमस्कार ।
जाता झाला अतिसत्वर । माहेश्वरनामक जो । कृष्णनाम ज्यांचिये वाचे । हृदयीं कृष्णध्यान ज्यांचे।
कृष्णभजनीं तत्पर साचे । दास्य त्यांचें मज उदित ।
एवं ज्वराची संपली कथा । तंव बाणासुरें ऐकिली वार्ता । ज्वरें यादवां दिधली व्यथा । विकळ सर्वथा वीर पडिले । ऐसिये समयीं समराङ्गणा । जाऊनि धरावें रामकृष्णां ।
मग समस्ता यादवगणा । बांधिजे तृणापडिपाडें ।
ऐसा करूनि दृढ विचार । रथीं चढला बाणासुर ।
कृष्णाप्रति अतिसत्वर । झाला तत्पर युद्धासी ।
प्रमथ म्हणती बाणासुरा । हर्षें प्रार्थूनियां शंकरा ।
युद्धीं निववी बाहुभारा । ऐसिया वीरा याचिलें ।
तो वर आजि सफळ झाला । इच्छे सारिखा वीर आला ।
कंडू वर्ते तव भुजांला । करितो वहिला प्रशान्त ।
ध्वज भंगूनि पडिला क्षिती । तेव्हांचि फळली शिववरोक्ति ।
आतां जाऊनि समराप्रति। इच्छा पुरी करिं आपुली ।
तव रक्षणा गेला शिव । तोही पावला पराभव ।
यादवीं भंगिले महाशाम्भव। हा गौरव तव वरें ।
ऐसें नोकिती प्रमथगण । तें ऐकोनि क्षोभला बाण ।
पाचारूनि जनार्दन । दावी आंगवण ते ऐका ।
श्रीकृष्णांनी असे म्हटल्यानंतर माहेश्वर ज्वर त्यांना प्रणाम करून निघून गेला. तोपर्यंत बाणासुर रथावर स्वार होऊन श्रीकृष्णांशी युद्ध करण्यासाठी पुन्हा आला. आपल्या समान योद्धा युद्ध करण्यासाठी मिळावा अशी बाणासुराची फार दिवसांपासून इच्छा होती. त्याचे बाहू पराक्रम गाजविण्यासाठी फुरफुरत होते. आता श्रीकृष्णाच्या रुपाने त्याला समसमान योद्धय़ाशी लढता येणार होते.
Ad. देवदत्त परुळेकर