फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये जि.प.च्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. ग्रा.पं. ही जि. प. निवडणुकीची रंगीत तालीम ठरू शकते. त्यामुळे ग्रा.पं. निवडणूक चुरशीची होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर रणसंग्राम सुरू झाला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये भाजपविरोधात महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनही घटक पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढणार आहेत. स्थानिक स्तरावर प्रथमच अशी आघाडी होऊन निवडणूक लढविली जाणार असल्याने ही महाविकास आघाडीसाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे.
सिंधुदुर्गातील भाजपचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे घटक पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तर रत्नागिरीत शिवसेनेला आपले वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. एक वर्षानंतर जि. प. च्या निवडणुका हेऊ घातल्या आहेत. त्यामुळे ग्रा.पं. निवडणुका जि. प. निवडणुकीची रंगीत तालीम ठरू शकते. त्यामुळे ग्रा.पं. निवडणुकीत चुरस वाढणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या असून 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे, 18 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढवल्या जात नसल्या तरी ग्रा पं. आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करीत असतो. स्थानिक स्तरावरच्या राजकारणातूनच पुढे जाता येते. ज्यांच्या ताब्यात ग्रा.पं. त्यांना जि. प. विधानसभा निवडणुका थोडय़ा सोप्या होतात. त्यामुळे ग्रा.पं. निवडणुकीतही प्रत्येक पक्ष जातीने लक्ष घालत असतो.
ग्रा.पं. निवडणुकीचे बिगूल वाजताच दोन्ही जिल्हय़ातील पक्ष आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 70 तर रत्नागिरी जिल्हय़ातील 479 ग्रा.पं.च्या निवडणुका होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हय़ात बहुतांश ग्रा.पं.वर भाजपाचे अर्थात भाजप खासदार नारायण राणे यांचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी शिवसेनेला महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवावी लागणार आहे, तरच या निवडणुका अधिक चुरशीच्या होऊ शकतात.
नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना ग्रा.पं. निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे ग्रा.पं.वर काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र ते भाजपवासी झाल्यानंतर ग्रा.पं.वर भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. भाजपनंतर शिवसेना आणि इतर पक्षांचे वर्चस्व आहे. नारायण राणे भाजपवासी झाल्यानंतर या निवडणुका पहिल्यांदाच होत असल्याने त्यांनाही आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. राणे यांचे सध्या ग्रा.पं., जि. प., नगरपालिकांवर चांगलेच वर्चस्व आहे. मात्र हे सर्व वर्चस्व भाजपमध्ये नसतानाचे आहे. ते आता भाजपमध्ये आल्यानंतरही वर्चस्व ठेवण्यासाठी ताकद लावावी लागणार आहे. त्यामुळे त्यांनीही या निवडणुकीत लक्ष घातले असून राणेंच्या नेतृत्वात तरी भाजपला ग्रा.पं. निवडणुकीत अच्छे दिन येतील का हे पहावे लागणार आहे.
त्यामुळे आता पुन्हा एकदा आपली सर्व सत्तास्थाने परत मिळवण्यासाठी त्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे आणि त्याची सुरुवात स्थानिक स्तरापासूनच म्हणजे ग्रा. पं. निवडणुकांपासून करावी लागणार आहे. सिंधुदुर्गात राणेंच्या भाजपचे वर्चस्व असल्याने ते मोडीत काढण्यासाठी राज्यातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीला आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच स्थानिक स्तरावरील निवडणुका होत आहेत. त्यामुळे ग्रा.पं. निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याचा प्रयोग यशस्वी होतो का, याचीही चाचपणी होणार आहे.
स्थानिक स्तरावरच्या निवडणुकीत यश मिळाले तर आगामी जिल्हा बँक, सहकारी संस्थेच्या निवडणुका आणि जि.प. निवडणुकीतही भाजपविरोधात महाविकास आघाडी कायम राहू शकते.
सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या प्रवेशानंतर भाजपचे वर्चस्व निर्माण झाले असले तरी राणेंविरोधात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्रित आल्यास राणेंच्या वर्चस्वालाही पुन्हा एकदा धक्का बसू शकतो. त्यामुळे राणे आणि भाजपाला आपले वर्चस्व दाखविण्यासाठी ग्रा. पं. निवडणुकीपासूनच तयारी करावी लागणार
आहे.
रत्नागिरी जिल्हय़ातील ग्रा.पं.वर शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्या ठिकाणी भाजपला वर्चस्व मोडीत काढण्यासाठी ताकद लावावी लागणार आहे. रत्नागिरी जिल्हय़ातही महाविकास आघाडी करणार असल्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. परंतु, त्या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व असल्याने शिवसेना महाविकास आघाडी करणार का आणि केली, तर शिवसेनेला राजकीय फायदा होतो की तोटा, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. रत्नागिरी जिल्हय़ात शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांचाच दबदबा आहे. हा दबदबा ग्रा.पं. निवडणुकीतही कायम ठेवून आपली ताकद कायम ठेवण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.
ग्रा.पं. निवडणुका पक्षीय चिन्हावर लढल्या जात नसल्यातरी प्रत्येक पक्ष आपले वर्चस्व ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे रणसंग्राम तर होणार आहे. फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये जि.प.च्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे ग्रा.पं. निवडणूक जि. प. निवडणुकीची रंगीत तालीम ठरू शकते. त्यामुळे ग्रा.पं. निवडणूक चुरशीची होणार आहे. विकासाचा केंद्रबिंदू हा प्रत्येक गाव असतो. त्यामुळे गावच्या निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावणार आहे.
संदीप गावडे