नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना चालू वर्षाच्या अखेरीस भारत दौऱयाचे निमंत्रण मिळणार आहे. वर्षाच्या अखेरीस शांघाय सहकार्य परिषदेचे (एससीओ) नवी दिल्ली येथे आयोजन होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने सदस्य देशाचा प्रमुख या नात्याने भारत सरकार इम्रान खान यांनाही परिषदेत सामील होण्यासाठी निमंत्रित करणार आहे.
भारतीय विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी याची पुष्टी दिली आहे. दोन्ही देशांमधील चर्चा बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात थेट संवाद होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.
सर्वसाधारणपणे एससीओ परिषदांमध्ये विदेशमंत्री सहभागी होतात. पण काही देशांचे पंतप्रधानही यात भाग घेत आहेत. भारताच्या बाजूने शासनप्रमुखांच्या बैठकीत विदेश मंत्री सहभागी होतात. तर एससीओ राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत पंतप्रधान सामील होत असतात. पाकिस्तान एससीओचा सदस्य असल्याच्या त्याच्यावतीने भारत दौऱयावर कोण येतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
एससीओ परिषदेत इम्रान खान यांच्या सहभागाचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. वर्षाच्या अखेरीस शांघाय सहकार्य संघटनेची वार्षिक बैठक आयोजित केली जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश जून 2017 मध्ये एससीओचे पूर्णवेळ सदस्य झाले होते.