महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात पाटण पंढरपूर राज्यमार्ग रोखून धरला
उंब्रज/प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावरून राजू शेट्टी यांच्या कोल्हापूरात सुरू असलेल्या आंदोलनाचे शुक्रवारी ठिकठिकाणी पडसाद उमटले. उंब्रज येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाविरणच्या उंब्रज कार्यालयासमोरुन जाणारा पाटण पंढरपूर राज्य मार्ग काही काळ रोखून धरल्याने वाहतूक ठप्प झाली. दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी केल्याने आंदोलकांनी माघार घेतली पंरतु महावितरण व सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांवरील अन्याय दूर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला.
शेती पंपाला दिवसा १० तास अखंड वीजपुरवठा मिळावा तसेच चुकीच्या पद्धतीने चाललेली वीज बिल वसुली तातडीने थांबवावी. चुकीची वीजबिले तात्काळ दुरुस्त करून द्यावी या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी उंब्रज येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सकाळी ११ वाजता पाटण-पंढरपूर राज्यमार्गावर रास्ता रोको करुन आंदोलन करण्यात आले. उंब्रज येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाच्या समोरच राज्यमार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. त्यांनी महावितरणचा सध्याचा कारभार व सरकार विरोधी घोषणा देत दोन्ही बाजूची वाहतूक अडवून धरली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर राज्यमार्गावर ठिय्या उठवण्यात आला.
यावेळी शेतकरी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नांवर आंदोलन पुकारले आहे हे आंदोलन शासनाने गांभिर्याने घ्यावे,शेती पंपाला दिवसा १० तास अखंड वीजपुरवठा मिळलाच पाहिजे. स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील म्हणाले शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. पंरतु शेतकऱ्यांवरच अन्याय होते ही शोकांतिका आहे. महावितरणच्या चुकीच्या नियोजनामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शेती पंपाला दिवसा दहा तास अखंड वीजपुरवठा होणे गरजेचे आहे.
तसेच चुकीच्या पद्धतीने चाललेली वीज बिल वसुली तातडीने थांबवावी. चुकीची वीजबिले तात्काळ दुरुस्त करून द्यावी या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य तातडीने मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल.
यावेळी वसंतराव पाटील, प्रशांत कदम,कॅप्टन इंद्रजित जाधव यांनी आपली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनोगत व्यक्त केले. यानंतर महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता चेतन कुंभार यांना शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन दिले.
राज्य मार्ग रोखला गेल्यामुळे काही काळ रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली होती.यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून वाहतुक सुरळीत केली. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष, देवानंद पाटील, कराड उत्तर अध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे आदी सहभागी झाले होते.