बेळगाव / प्रतिनिधी
बसवेश्वर उड्डाणपुलाच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. एका बाजूच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, दुसऱया बाजूचे काम अद्यापही करण्यात आले नसल्याने वाहनधारकांना गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे दुसऱया बाजूच्या रस्त्याची दुरुस्ती कधी होणार? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.
उड्डाणपुलाची उभारणी घिसाडघाईने करण्यात आल्याने उद्घाटन झालेल्या सहा महिन्यातच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी भगदाड पडले असून रस्ता व फुटपाथ खचले होते. पावसाळय़ात रस्ता खचल्याने तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती. मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूंनी रस्ता खचल्याने वाहनधारकांना अडचणीचे ठरले होते. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्याची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेऊन पावसाळा संपल्यानंतर हे काम हाती घेण्यात आले. डिसेंबर महिन्यात सदर पुलाच्या एका बाजुच्या दुरुस्तीचे काम सुरू करून पूर्ण करण्यात आले. यावेळी पुलावरील वाहतूक एका बाजूने सुरू ठेवण्यात आली होती. पुलाच्या एका बाजूच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन 15 दिवस उलटले तरी दुसऱया बाजूच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे हा रस्ता असाच राहणार का? असा मुद्दा वाहनधारक करीत आहेत.
पुलाच्या दुतर्फा रस्ता खचल्याने सिमेंट काँक्रीटने दुरुस्ती करण्यात आली होती. त्या ठिकाणी आता गतिरोधकसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह सर्वच वाहनांना धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी वाहने आपटत आहेत. अशातच पुलावरील पथदीप बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीबरोबरच पथदीप सुरू करण्याकडेदेखील रेल्वे खाते आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने कानाडोळा केला आहे. याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. दुसऱया बाजूच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम कधी करणार की हा रस्ता असाच राहणार, अशी विचारणा नागरिक करीत आहेत. या रस्त्याचीही दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.