प्रतिनिधी/ पणजी
काँग्रेसने 70 वर्षांत काय केले असा सवाल करणाऱया मोदी सरकारने सत्तेच्या अल्पकाळात सध्या संपूर्ण देशच विक्रीस काढला आहे, त्याचे काय, असा सवाल काँग्रेसचे युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी केला आहे.
युवा काँग्रेसतर्फे देशभरात चालविलेल्या महागाई विरोधातील निदर्शनांचा भाग म्हणून शनिवारी पणजीतही निदर्शने करण्यात आली. त्यावेळी म्हार्दोळकर बोलत होते. काँग्रेसने 70 वर्षात बीएसएनएल, एलआयसी, रेल्वे, स्टेडियम, विमानतळ, गॅस पाईपलाईन, पॉवर प्लांट यासारख्या राष्ट्रीय मालमत्ता निर्माण केल्या होत्या. त्या आज मोदी सरकारने विक्रीस काढल्या आहेत. एकंदरीत आज मोदी सरकारने संपूर्ण देश संपविण्याचा घाट घातला आहे. आपल्या दोन बडय़ा उद्योगपती मित्रांना मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा घाट घातला आहे, असा आरोप म्हार्दोळकर यांनी केला.
एखाद्या व्यक्तीची आर्थिक बिकट झाली म्हणून तो आपले घर किंवा घराची कौले विकत नाही. परंतु विद्यमान मोदी सरकार देशाची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे कारण देत मोठमोठय़ा सरकारी मालमत्ता खासगी कंपन्यांच्या घशात घालत सुटले आहे. यात एखादी नुकसानीत चालणारी मालमत्ता विकल्यास कुणी हरकत घेणार नाही, परंतु येथे तर फायद्यात चालणाऱया मालमत्ताही धनदांडग्यांच्या घशात घालण्यात येत आहेत, असे म्हार्दोळकर म्हणाले.
या व्यवहारातून चार वर्षांत सहा लाख कोटी रुपये महसूल जमा होईल, असा दावा मोदी सरकार करत आहे. परंतु सदर पैशांची गुंतवणूक कुठे करणार ते मात्र कुणीच सांगत नाही. त्यामागे कोणते धोरण, विचार आहेत, तेही कुणीच स्पष्ट करत नाही. मोदी यांनी सर्व विमानतळे अदानींच्या घशात घातली आहेत. देशातील मोठी बंदरेही त्यांच्याच ताब्यात देण्यात आली आहेत. अंबानी यांच्या जीओ कंपनीस फायदा करून देण्यासाठी बीएसएनएल संपविण्याचा घाट मोदी यांनी घातला आहे. अशा कित्येक प्रकारातून मोदी यांचे हे सर्व व्यवहार अंबानी, अदानींसारख्या उद्योगपतींच्या हितासाठीच आहेत हेच स्पष्ट होत आहे, असे म्हार्दोळकर म्हणाले.
दिगंबर कामत यांनी बोलताना, मोदी सरकारने हाती घेतलेल्या राष्ट्रीय निर्गुंतवणूक धोरणामुळे देशाची बहुमूल्य मालमत्ता क्रोनी पॅपिटलिस्ट असलेल्यांच्या घशात घातल्यासारखे होणार आहे. माणसाच्या शरीरात ज्याप्रकारे रक्तवाहिनी त्याच प्रकारे देशासाठी वीजवाहिनी असते. त्यातूनच त्यांचा विकास होत असतो. अशी मालमत्ता विकण्याचा किंवा खासगीकरण करण्याचा सहजा कोणी प्रयत्न करत नाही. परंतु विद्यमान सरकारने हे सर्व संकेत पायदळी तुडवत बहुमूल्य अशा मालमत्ता विकण्याचा घाट घातला आहे. या प्रकारातून देश दिवाळखोरीत जाईल, हे नक्की आहे, असे ते म्हणाले.
गिरीश चोडणकर यांनी बोलताना, मोदी सरकारच्या निर्गुंतवणूक धोरणावर जोरदार हल्ला चढवला. यातून मोदी देश संपविण्यास पुढे आले आहेत हेच स्पष्ट होते, असे ते म्हणाले. मोदींचे हे सर्व प्रयत्न आपल्या उद्योगपती मित्रांना मदत करण्यासाठी आहेत. आधीच नोटाबंदी करून मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था लयास नेली. त्यानंतर सुमारे 1.50 लाख कोटी किंमतीचे देशाचे सोने विकून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असल्याचे सर्व जगास दाखवून दिले. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, बीएसएनएल, बंदरे, यासारख्या अन्य मालमत्तांचीही विक्री करण्यात आली, असे आरोप चोडणकर यांनी केले.
त्यानंतर शहरातून मोर्चा काढत मोदी सरकारच्या देशविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. देशाची मालमत्ता विकू नका, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या मोर्चात मोठय़ा संख्येने युवा आणि अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.