दोडामार्ग / वार्ताहर:
कोकणातील तरुणांनी उद्योग क्षेत्राकडे वळले पाहिजे. त्यांना या क्षेत्रात स्वनिर्भर करण्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे. माझ्याकडे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग विभाग आहे. यासाठी लागणारे अर्थसहाय्य करून सबसिडीही त्यांना देण्यात येईल. माझ्याकडे असलेल्या उद्योगमंत्री पदाचा फायदा मी कोकण व पर्यायाने सिंधुदुर्गसाठी करणार आहे. त्यामुळे येथील तरुण पिढी उद्योजक होईल शिवाय इतरांनाही रोजगार उपलब्ध करू शकेल. हे उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण केंद्र लवकरच ओरोस येथे सुरू करण्यात येणार आहे. आणि हे सर्व काम करण्यासाठी तुम्हा जनता जनार्दनांनी मला आशीर्वाद द्या असे उद्गार केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काढले.जन आशीर्वाद यात्रा आज दुपारी 2.30 वाजण्याच्या दरम्यान येथे आडाळी येथे दाखल झाली. हा कार्यक्रम आडाळी गावातीलच मंदिरात आयोजित झाला होता. यावेळी नाम. राणें यांचे ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, यात्रा प्रमुख प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांसह सुधीर दळवी, सूर्या गवस, रमेश दळवी, संजय विर्नोडकर आदी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शिवाय आडाळी सरपंच उल्का गावकर, ग्रा. पं. सदस्य पराग गावकर व ग्रामस्थ यांनीही श्री. राणें यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यावर केंद्रीय उद्योगमंत्री पदाची जबाबदारी सोपवली याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भाजपने मोठी जबाबदारी दिली असून हा कोकणचा सन्मान आहे. कोकणी जनतेच्या आशीर्वादामुळे हे मंत्रिपद मला मिळाले आहे. कोकणी माणसाने माझे परिवर्तन करून मला भरभरून प्रेम दिले आहे. केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत सर्व मंत्र्यांना आपल्या भागात व मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रा काढण्यास सांगितले. यात्रेच्या माध्यमातून गेल्या सात वर्षात केंद्र सरकारने सुरू केलेल्या लोकपयोगी योजनांची माहिती जनतेला दिली जात आहे असे राणे यांनी स्पष्ट केले.
पांढऱ्या पायाच्या सरकार काहीही करणार नाही – नाम. नारायण राणे
राणे म्हणाले, आपण उद्योग मंत्री असताना आडाळी येथे एमआयडीसी मंजूर केली तसेच त्यासाठी लागणारी जमीनीही घेण्याचे काम आपण केले होते. मात्र त्यानंतर आलेल्या पांढऱ्या पायाच्या सरकारने या आडाळी एमआयडीसीची साधी वीट सुद्धा रचली नाही. नुसत्या घोषणा दिल्या, सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचेच काम या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केले. खास दोडामार्ग तालुक्यासाठी असलेल्या या एमआयडीसीमधील जमिनी राज्य सरकारकडे तुम्ही मागा तुम्ही स्वतःचे छोटे-मोठे उद्योग व्यवसाय तिथे उभारावे व तुम्ही उद्योजक व्हा केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल असेही राणे म्हणाले.
राणें यांचे तहसीलदारांकडून स्वागत केंद्रीय मंत्री पद मिळाल्यानंतर तालुक्यात प्रथमच आलेल्या नारायण राणें यांचे प्रशासनाच्या वतीने आडाळी येथे दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.