सातारा / प्रतिनिधी
राज्यातील तीस लाखांहून अधिक कुटुंबाच्यात शाश्वत उपजीविकेची उमेद निर्माण करणाऱ्या उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान कर्मचाऱ्यांवर आर्थिक काटकसरीच्या नावाखाली नोकर कपातीची टांगती तलवार लटकत आहे. याबाबत एमएसआरएलएमचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण कुमार जैन यांनी नुकतेच मनुष्यबळ संसाधन विभागासाठी नवीन धोरण ठरवण्याचे व जुन्या करार संपलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे परिपत्रक जारी केले आहे. या पत्रकानुसार 300 कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीचे प्रस्ताव रखडले आहेत. तर 400 जणांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. तडकाफडकी घडत असलेल्या घडामोडींमुळे राज्यभरातील उमेद कर्मचारी अस्वस्थ झाले असून मानसिक व सामाजिक दृष्ट्या त्यांचे खच्चीकरण होत असल्याची भावना व्यक्त करत आहेत.
2013 पासून राज्यभरात उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत गरीब वंचित घटकांना एकत्रित करून त्यांची संस्था बांधणी केली जात आहे. या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याबरोबरच वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व्यापक चळवळ उभी करण्यात आली आहे. यातून त्यांचे सामाजिक आर्थिक समावेशन करण्याबरोबरच शाश्वत उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या क्षमता बांधणीचे काम केले जात आहे. या अभियानात राज्यभरातील सुमारे चार हजार कंत्राटी कर्मचारी समर्पित भावनेने काम करत आहेत. यामुळे ग्रामीण भागात स्वयंसहायता समूहाच्या आर्थिक परिवर्तनाची चळवळ भक्कमपणे उभी राहताना दिसत आहे. मात्र ही चळवळ पूर्णपणे उभी राहण्याची ती कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला यांची नुकतीच तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडील कार्यभार प्रभारी कार्यकारी अधिकारी म्हणून प्रवीणकुमार जैन यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांनी 14 ऑगस्ट 2020 रोजी अर्थ विभागाने जारी केलेल्या परिपत्रकाचा आधार घेत राज्यात नव्हे तर देशात आदर्शवत असणारी उमेद अभियानाची मनुष्यबळ संसाधन कार्यपद्धती बदलण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. यासाठी विशेष परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार जिल्हास्तरावरून होणाऱ्या उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्ती तात्काळ रोखण्यात आले आहेत. नवीन पुनर्नियुक्ती प्रस्ताव स्विकारण्यास निर्बंध घातले आहेत.
यामुळे 300 जणांच्या नियुक्तीवर कर्मचारी कपातीची टांगती तलवार लटकू लागली आहे. चारशे जणांना तर परिपत्रकाच्या दुसऱ्याच दिवशी कार्यमुक्त करून घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जे सुपात आहेत ते आज ना उद्या नक्कीच जात्यात जाणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे उमेद कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रचंड अस्वस्थता पसरले आहे. कर्मचारी कपातीची टांगती तलवार डोक्यावर लटकत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक व सामाजिक खच्चीकरनाची भावना निर्माण झाली आहे. लाखोंच्या जीवनात शाश्वत उपजीविकेची उमेद निर्माण करून वंचित घटकांच्या समृद्धीसाठी प्रयत्न करणारे कर्मचारी स्वतःच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने हवालदिल झाले आहेत.
Previous Articleसातारा जिल्ह्यात ६२९ जण कोरोनाबाधित ; तर ३१ नागरिकांचा मृत्यू
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.