प्रतिनिधी / कणकवली
राज्य सरकारने उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुन:नियुक्ती थांबविण्याचे आदेश दिले. यामुळे ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहामध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. कणकवली तालुक्यातल्या नाटळ हिरकणी प्रभागसंघातील नरडवे नाटळ, कुंभवडे, दारिस्ते, दिगवळे येथील ग्रमसंघातील पदाधिकारी, सीआरपी ताई, कृषिसखी व महिलांनी आपापल्या गावात प्रभात फेरी काढून जनजागृती केली. तसेच स्वच्छता करून शासनाला हे अभियान चालविण्यासाठी प्रत्येकी १ रुपया मदतही गोळा केली. यावेळी आपले मत मांडताना या महिला म्हणाल्या की उमेद अभियानातील या सर्वच कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे, तेव्हा आता त्यांना शासन जर कमी करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. कारण या लोकांनी आम्हाला संघटित करून नवा विचार दिला आहे. त्यामुळे शासनाला जर या कर्मचाऱ्यांना द्यायला पैसे नसतील तर आम्ही देतो मात्र या अधिकाऱ्यांना काढून हे अभियान बंद करू नये अशी मागणी या महिलांनी केली आहे.
Previous Articleकेंद्र सरकारने खासगीकरण थांबवावे
Next Article पंजाबमध्ये एका दिवसात 1,793 नवे कोरोना रुग्ण