प्रतिनिधी /पणजी
काँगेस आणि तृणमूल काँगेस या दोन्ही पक्षांना सोडचिठ्ठी दिलेले ऍड. यतीश नाईक यांनी अखेर भाजपाचे कमळ हाती घेतले असून सोमवारी भाजपामध्ये प्रवेश केला. स्थिरता, विकास, विश्वास या मंत्रावर भाजपाला जनतेले विधानसभा निवडणुकीत कौल दिला असून पक्ष सांगेल ते काम करणार असल्याची ग्वाही ऍड. नाईक यांनी दिली.
पणजीतील भाजपा कार्यालयात हा प्रवेश सोहळा सोमवारी झाला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सदस्यता पावती, भाजपाचा शेला गळयात घालून व पुष्पगुच्छ देऊन नाईक यांचे पक्षात स्वागत केले. त्यांचा हा भाजप प्रवेश बिनशर्त असून त्यांनी कोणतीच मागणी केली नाही किंवा अट घातली नसल्याचे तानावडे यांनी नमूद केले.
भाजपाची तत्वे योग्य असून त्यांच्याशी आपण बांधिल असल्याचे यावेळी नाईक म्हणाले. नाईक यांच्या इतर सहकाऱयांनी देखील यावेळी भाजपात प्रवेश केला.
भाजपा प्रदेश महिला समिती विविध कारणांमुळे बरखास्त करण्यात आली असून तिची लवकरच पुन्हा स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सदानंद शेट तानावडे यांनी दिली.