वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारला एअर इंडियासाठी येत्या 15 सप्टेंबरपर्यंत बोली मिळण्याची शक्यता आहे. बोलीची मुदत आता वाढवली जाणार नसल्याचेही संकेत सरकारकडून व्यक्त करण्यात आले आहेत. याकरीता आता वेग आला असून या स्पर्धेत टाटा ग्रुपचे नाव आघाडीवर घेतले जात आहे.
दुसरीकडे सरकारकडून देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या प्री आयपीओ फंडिंग प्रोग्रॅममध्ये विदेशी गुंतवणूकदारांना पैसा गुंतवण्यासाठी परवानगी मिळण्याचे संकेत आहेत. कंपनीमध्ये आयपीओ अगोदर एफआयआय/एफपीआय म्हणजे फॉरेन इन्स्टिटय़ूशन इनवेस्टर यांनाही गुंतवणूक करण्याची संधी देण्यासाठी विचार केला जात आहे.
15 सप्टेंबरपर्यंत बोलीची शक्यता
केंद्रीय नागरी विमान राज्य मंत्री व्ही.के.सिंह यांनी संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना म्हटले आहे, की ‘एअर इंडियासाठी 15 सप्टेंबरपर्यंत बोली मिळण्याची शक्यता व्यक्त केली होती. यामध्ये म्हटले होते, की मागील वर्षात 14 डिसेंबरपर्यंतची तारीख निश्चित केली होती. आता 15 सप्टेंबर हीच अंतिम तारीख बोलीसाठी असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
चालू वर्षात पूर्ण हिस्सेदारी विकणार
चालू आर्थिक वर्ष समाप्त होण्याच्या अगोदर एअर इंडिया आपली पूर्ण हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत आहे. साधारणपणे उपलब्ध माहितीनुसार टाटा समूह या व्यवहारात सर्वात पुढे असल्याची माहिती आहे.