मनपाकडून प्रकल्पासाठी दीड कोटीची तरतूद : एपीएमसीकडे दहा गुंठे जागेची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
तुरमुरी कचरा प्रक्रिया प्रकल्पात क्षमतेपेक्षा जास्त कचरा जमा होत असल्याने प्रक्रिया करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कचऱयापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. पाच टन क्षमतेचा प्रकल्प एपीएमसी परिसरात राबविण्यासाठी जागेची मागणी करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
शहरातील कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेला आटापिटा करावा लागत आहे. शहरात दररोज अडीचशे टन कचरा जमा होत असल्याने प्रक्रिया करण्याची समस्या भेडसावत आहे. तुरमुरी कचरा डेपोमध्ये रॅम्के कंपनीच्यावतीने कचऱयावर प्रक्रिया करून खत उत्पादन करण्यात येते. पण क्षमतेपेक्षा अधिक कचरा जमा होत असल्याने कचऱयावर प्रक्रिया करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. प्लास्टिक, रबर, फायबर, काच असा सुका कचरा जमा होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कचऱयाचे विघटन करावे लागत आहे. कचरा विघटन करण्यासाठी वेळ जात असल्याने प्रक्रिया करण्यास विलंब होत आहे.
सध्या एपीएमसी येथील भाजी मार्केटमधे दररोज ओला कचरा जमा होत असल्याने या कचऱयावरदेखील प्रक्रिया करण्यात येते. त्यामुळे ओल्या कचऱयावर प्रक्रिया करून वीजनिर्मितीचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
पाच टन क्षमतेचा वीज निर्मितीचा प्रकल्प राबविण्यासाठी राज्य शासनाकडून मंजुरी घेण्यात आली आहे. प्रकल्प राबविण्याकरिता पंधराव्या वित्त आयोग निधीअंतर्गत दीड कोटीच्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. सदर प्रकल्प राबविण्यासाठी दहा गुंठे जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे हा प्रकल्प एपीएमसी परिसरात राबविण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता महापालिकेने एपीएमसीकडे दहा गुंठे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
दररोज 400 ते 450 किलोवॅट विजेचे उत्पादन शक्य
एपीएमसी परिसरात दररोज दोन ते अडीच टन ओला कचरा निर्माण होतो. त्यामुळे एपीएमसीमधील हा कचरा आणि शहरातील ओला कचरा जमा करून पाच टन कचऱयापासून वीज निर्मिती करण्यात येणार आहे. ओल्या कचऱयामधून बायोमिथेनाईज गॅस उत्पादित करून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. पाच टन कचऱयापासून दररोज 400 ते 450 किलोवॅट विजेचे उत्पादन होऊ शकते. सदर प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा प्रस्ताव असून हा प्रकल्प यशस्वी झाल्यास शहर परिसरात आणखी दोन ठिकाणी अशा प्रकारचे प्रकल्प राबविण्याचा महानगरपालिकेचा विचार असल्याचे अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.
सदर प्रस्तावाचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून तांत्रिक मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम मार्गी लागणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.