वार्ताहर /अगसगे
एपीएमसी ते कंग्राळी खुर्द रस्त्याचे दुःख कशा पद्धतीने व्यक्त करायचे हा प्रश्न आहे. रोजच्या मरणाला रडणार तरी कोण असा प्रश्न आता कंग्राळी खुर्दसह पंचक्रोशीतील अनेक गावच्या नागरिकांना पडला आहे. या रस्त्यासाठी अनेक आंदोलने झाली. मात्र, अजूनही या रस्त्याचे काम अर्धवटच आहे. काही ठिकाणीच रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, इतर ठिकाणी काम अर्धवटच आहे.
या रस्त्याच्या बाजूला लागूनच खडी, माती व दगडाचे ढिगारे अद्याप पडूनच आहेत. त्यामुळे विशेषकरून रात्रीच्या वेळी अपघात होत आहेत. तेव्हा हा रस्ता तातडीने पूर्ण करावा, तसेच खडी, दगड व मातीचे ढिगारे हटवावेत, अशी मागणी होत आहे.
एपीएमसीपासून कंग्राळी खुर्द हे अंतर केवळ एक किलोमीटर आहे. मात्र हा रस्ता करण्यासाठी गेली तीन वर्षे आंदोलने करावी लागली आहेत. जिल्हा पंचायत माजी सदस्या सरस्वती पाटील, कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतीचे आजी-माजी सदस्य, देवस्थान पंच मंडळी, ग्रामस्थ यांनी भर रस्त्यात उन्हात रास्तारोको करून आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. केवळ एक किलोमीटर रस्ता करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतरावे लागते, हे अत्यंत दुर्दैवी आहे. जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या मुर्दाड वागण्यामुळे आणि बेजबाबदारपणामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडून जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत. तरीदेखील प्रशासनाला त्याचे काहीच गांभीर्य वाटले नाही. आता कंत्राटदाराने काम सुरू केले आहे. मात्र ते अत्यंत कासवगतीने सुरू आहे. सरकारी काम बारा महिने थांब या म्हणीलाही कंत्राटदाराने मागे टाकले आहे. सरकारी काम आणि तीन वर्षे थांब अशी परिस्थिती निर्माण केली आहे.
सध्या या रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. आता साखर कारखाने सुरू होणार असल्याने या रस्त्यावरून ऊस वाहतूक करणाऱया वाहनांची रस्त्यावर वर्दळ वाढणार आहे. तेव्हा हा रस्ता तातडीने पूर्ण करावा, तसेच रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आलेले खडी, दगडाचे ढिगारे हटवावेत, याच बरोबर ज्या ठिकाणी फुटपाथ तयार करायचे आह। ते देखील तातडीने तयार करावे, अशी मागणी होत आहे.