प्रतिनिधी/ बेळगाव
कपिलेश्वर उड्डाणपुल ते महात्मा फुलेरोड कॉर्नर पर्यंतच्या एसपीएम रोडचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. मात्र सदर काम गेल्या दोन वर्षापासून हाती घेऊनही अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे येथील रहिवाशांसह व्यवसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एसपीएम रोडचे अर्धवट काम कधी पूर्ण होणार अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
एसपीएम रोडवर डेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण रस्ता खराब झाला होता. त्यानंतर स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्याच्या विकासाचे काम सुरू करण्यात आले आहे. पण हे काम देखील व्यवस्थित आणि वेळेवर होत नसल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. प्रारंभी रस्त्याच्या एका बाजुचे काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यानंतर गटारीचे बांधकाम सुरू करण्यात आले. त्यामुळे येथील रस्ता वर्षभर बंद होता. अलिकडेच दुसऱया बाजुच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पण हे काम देखील अर्धवट असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कपिलेश्वर उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावर रेणुका हॉटेलसमोर काँक्रिटीकरणाचे काम अर्धवट असून, वाहनधारकांना ये-जा करण्यासाठी रॅम्प देखील करण्यात आले नाही. अशातच या ठिकाणी दोन्ही बाजुला वाहने पार्क करण्यात येत आहेत. परिणामी वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच कपिलेश्वर उड्डाणपुलापासून शिवाजी उद्यानपर्यंतच्या बाजुचा रस्त्यावरील साईडपट्टय़ा करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे वाहनधारकांना तसेच व्यवसायिकांना अडचणीचे ठरले आहे. सदर काम गेल्या तीन महिन्यापासून करण्यात येत असून, अर्धवट कामाचा फटका रहिवासी, वाहनधारक आणि व्यवसायिकांना बसत आहे. कपिलेश्वर उड्डाणपुलापासून बँक ऑफ इंडिया कॉर्नर पर्यंतच्या एसपीएम रोडवर समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षापासून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून शहापुर, वडगाव, जुनेबेळगाव, येळ्ळूर, टिळकवाडी अशा भागातील वाहनधारक ये-जा करीत असतात. त्यामुळे वर्दळ असते. पण या प्रमुख रस्त्याचे काम करण्याकडे स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच याकडे जिल्हा प्रशासनाने देखील कानाडोळा केला आहे. त्यामुळे सदर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून रस्त्यावरील अडथळे दूर करावेत अशी मागणी करण्यात येत आहे.