प्रतिनिधी/ बेळगाव
जुना धारवाडरोड येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम कपिलेश्वर कॉलनी क्रॉस पर्यंतच करण्यात आले आहे. त्या पुढील रस्त्याचा विकास करण्याऐवजी डागडुजी करून जुजबी काम करण्यात आले आहे. त्यामुळे येथील खड्डय़ांचे साम्राज्य कधी संपणार असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
संगोळी राय्यण्णा चौकापासून जुन्या धारवाड रोडच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. सदर रस्त्याचे काँक्रिटीकरण लेंडी नाला पर्यंत करण्यात आले आहे. त्यापुढील रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. कपिलेश्वर कॉलनीला जोडणाऱया रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या क्रॉसजवळ मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने रस्ता पूर्णपणे निकामी झाला आहे. मात्र सध्या तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. मात्र सदर काम देखील अर्धवट करण्यात आल्याने या ठिकाणी पावसाळय़ात निर्माण झालेले खड्डे जेसेथे आहेत. सदर रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱया या रस्त्यावरून बस वाहतुकीसह अवजड वाहनांची वर्दळ जास्त आहे. त्यामुळे सदर रस्त्याची दुरूस्ती करून रस्त्याचा विकास करणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्याच्या रूंदीकरणावेळी डांबरीकरण केले होते. त्यानंतर येथील डांबरीकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी या मार्गावर ठिकठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सदर रस्ता खराब झाल्याने वाहनधारकांना कसरत करत ये-जा करावी लागत आहे. खडय़ामध्ये माती घालण्यात आल्याने सर्वत्र धूळ उडत आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या समस्येत आणखीनच भर पडली आहे. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाबरोबर नाल्याचे बांधकाम करण्यात येत आहे. पण हे काम देखील अर्धवट झाले असल्याने येथील व्यवसायिकांना अडथळय़ांना सामोरे जावे लागत आहे. वास्तविक पाहता हा रस्ता वर्दळीचा असल्याने प्राधान्य देऊन विकासकामे राबविणे आवश्यक आहे. मात्र स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांसह सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी याकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे या रस्त्याचा विकास कधी होणार असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.