6 केएल क्षमतेचा ऑक्सिजन रिफिलिंग प्लान्ट
जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेमुळे ऑक्सिजनचा प्रश्न सुटला
पालकमंत्री, खासदार यांचाही पाठपुरावा
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
कोरोनाच्या महामारीमध्ये आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन अर्थात प्राणवायूची किती किंमत आहे, हे सर्वांनाच कळून चुकले. ऑक्सिजनअभावी अनेक जीव तडफडून गेल्याच्या घटना सर्वत्र ऐकायला आल्या. याची गंभीरता ओळखून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ऑक्सिजन रिफिलिंग प्लान्ट उभारणीचा निर्णय घेतला. पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्याकडून मिळालेल्या सहकार्यामुळे अवघ्या 15 दिवसात ऑक्सिजन प्लान्ट उभारला गेला. सिंधुदुर्ग जिह्यासाठी ही मोठी ऍचिव्हमेंट ठरली आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठय़ात सिंधुदुर्ग जिल्हा स्वयंपूर्ण झाला आहे. गोवा व रत्नागिरी येथून ऑक्सिजन मागवावा लागत नाही.
कोरोनाग्रस्त असलेल्या गंभीर रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने आणि ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत होऊ न शकल्याने अनेक लोकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना देशभरात घडल्या. कोरोनाच्या दुसऱया लाटेत तर ही अतिशय भयावह स्थिती पाहायला मिळाली. हवाईमार्गे व रेल्वेने टँकर आणावे लागले. सिंधुदुर्ग जिह्यात ऑक्सिजन प्लान्ट नसल्याने दुसऱया जिह्यावर अवलंबून राहावे लागत होते. त्यात काही अडथळे आले तर ऑक्सिजन पुरवठय़ाअभावी रुग्णांना दुसऱया जिह्यात हलवणे किंवा जीव गमवावा लागण्याचीच वेळ येत होती.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी धाडसी पाऊल उचलत प्रथम जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी दोन ऑक्सिजन प्लान्ट उभारले. या प्लान्टमधून 225 ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती होत आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेत जिह्यात कोरोनाबधित रुग्णांची संख्या चौपटीने वाढली. चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांची संख्या दरदिवशी 400 च्या जवळपास असते. त्यासाठी जिह्यात असलेल्या शासकीय व खासगी मिळून 34 कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी दरदिवशी आठ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी गोवा, कोल्हापूर व रत्नागिरी येथून ऑक्सिजन पुरवठा होता. परंतु गोव्यातच ऑक्सिजन तुटवडा असल्याने गोव्याचा पुरवठा बंद झालेला आहे. कोल्हापूर-कागल येथील ऑक्सिजन कंपनीकडून दोन मेट्रिक टन आणि कोल्हापूर ऑक्सिजन कंपनीचीच शाखा असलेल्या रत्नागिरी-मिरजोळे येथील कंपनीकडून चार मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होत होता. त्यासाठी दरदिवशी कोल्हापूरला दोन आणि रत्नागिरीला चार गाडय़ा जात होत्या. तेथे येण्या-जाण्यामध्ये आठ-आठ तास वेळ जात होता. तसेच वाढती रुग्णसंख्या पाहता कधी ऑक्सिजनचा तुटवडा भासेल, हे सांगता येत नाही. आता कोरोनाची तिसरी लाट आली तर ती लहान मुलांसाठी धोकादायक आहे. अशावेळी ऑक्सिजनचा पुरवठा कितीपत पुरेसा होईल, याची धास्ती होती. त्यामुळे या संकटावर मात करण्यासाठी प्रथम जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी दोन ऑक्सिजन निर्मितीचे प्लान्ट उभारल्यानंतर कुडाळ एमआयडीसीत ऑक्सिजन रिफिलिंग प्लान्ट उभारण्याचा धाडसी निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला.
एका छोटय़ा जिह्यात हा प्लान्ट उभारणे कठीण होते. जी कंपनी हा प्लान्ट चालवेल त्या कंपनीला फार मोठा फायदा भविष्यात होणे कठीण. या जिह्यात मोठय़ा प्रमाणात मोठी हॉस्पिटल नाहीत किंवा मोठी इंडस्ट्री नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत कोण प्लान्ट चालवणार हा प्रश्नच होता. परंतु जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जनतेच्या आरोग्याचा आणि भविष्याचा विचार करून ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचा निर्णय घेतला. त्यांना पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक व प्रशासनातील अन्य अधिकारी यांची चांगली साथ लाभली. एमआयडीसीकडूनही तात्काळ जागा उपलब्ध झाली. अवघ्या पंधरा दिवसात प्लान्ट उभा राहिला.
कुडाळ एमआयडीसी येथे युनायटेड एअर गॅस प्रा. लि. कंपनीच्यावतीने उभारण्यात आलेल्या 6 केएल क्षमता असलेल्या प्लान्टचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. अवघ्या पंधरा दिवसात प्लान्ट उभारून सिंधुदुर्गात ऑक्सिजनचा प्रश्न सोडविल्याबद्दल जिल्हाधिकारी आणि पालकमत्र्यांचे कौतुकही त्यांनी केले.
ऑक्सिजन रिफिलिंग प्लान्टमधून जम्बो सिलिंडर प्रतिदिन 175 ते 200, बी-टाईप सिलिंडर प्रतिदिन 100 ते 125 तर डय़ुरा सिलिंडर प्रतिदिन 12 ते 14 रिफिलिंग होत आहेत. या प्लान्टमुळे सिंधुदुर्ग जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण झाला असून इतर जिह्यावर अवलंबून राहावे लागणार नाही. ऑक्सिजनसाठी नातेवाईकांची होणारी धावपळ थांबणार आहे
रुग्णांचे प्राण वाचविण्याला प्राधान्य!
कोरोना रोखण्यासाठी आणि कोरोनाबाधित रुग्णांना बरे करण्यासाठी सर्व
प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र राबत आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजनअभावी कुणाचा जीव जाऊ नये, यासाठी जे काही करता येईल त्याला प्राधान्य देण्यात येत आहे. म्हणूनच ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचा निर्णय घेतला. सर्वांच्या सहकार्याने प्लान्ट उभारणे शक्य झाल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ‘तरुण भारत’ला सांगितले.
ऑक्सिजन प्लान्ट सिंधुदुर्ग जिह्यात नसल्याने गोवा, कोल्हापूर, रत्नागिरी येथून ऑक्सिजनची गरज पूर्ण करावी लागत होती. वाहतुकीसाठीही वेळही जात होता आणि वाहतुकीत अडचणी आल्यास किंवा पुरवठय़ात तुटवडा निर्माण झाल्यास ऑक्सिजनअभावी रुग्णांचे जीव जाऊ शकतात, याची दखल घेऊन प्रथम जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी दोन ऑक्सिजन प्लान्ट सुरू केले. लवकरच कुडाळ महिला रुग्णालय, सावंतवाडी व कणकवली उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी प्रत्येकी एक ऑक्सिजन प्लान्ट तसेच जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणीसुद्धा आणखी एक प्लान्ट उभारला जाणार आहे.
ऑक्सिजन प्लान्टबरोबरच ऑक्सिजन रिफिलिंग प्लान्ट होणे गरजेचे होते. म्हणूनच कुडाळ एमआयडीसी येथे प्लान्ट उभारला. त्यासाठी पालकमंत्री, खासदार व आमदारांनीही पुढाकार घेतला. आता जिह्यातच ऑक्सिजन निर्मिती व रिफिलिंग होणार असल्याने रत्नागिरीवरून आणला जाणारा ऑक्सिजन थांबविला आहे. गोव्याकडून होणारा पुरवठा आधीच बंद झाला आहे. कोल्हापूर येथून सध्या ऑक्सिजन पुरवठा सुरू आहे. परंतु रिफिलिंग फ्लान्टमधून रिफिलिंग करण्याचे काम अगदी पूर्णपणे सेट झाल्यावर लवकरच कोल्हापूरचा पुरवठाही थांबविण्यात येणार आहे. जिह्यात 34 कोविड सेंटर आहेत. त्यामध्ये आता ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. पूर्वी 400 पर्यंत असलेली संख्या आता 672 पर्यंत गेली आहे. त्यात आणखी वाढ होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.