जागतिक हवामान बदलाच्या दुष्परिणामांबाबत जगभरातील हवामान शास्त्रज्ञ पुराव्यानिशी धोक्याचे इशारे देत असताना ऑस्ट्रेलियातील भीषण आगीने आता जगाचे लक्ष वेधले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून ऑस्ट्रेलियातील आग्नेय भागातील जंगल आगीच्या ज्वाळांनी वेढले आहे. या वणव्यात आत्तापर्यंत तब्बल 50 कोटी प्राणी आणि पक्ष्यांना जीव गमवावा लागला आहे. अक्षरशः गुदमरून आणि होरपळून या प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. सप्टेंबरपासून आगीचे तांडव सुरू आहे. दिवसेंदिवस ती भीषण स्वरूप धारण करीत आहे. गेल्या पाच महिन्यात या आगीने साडेतीन कोटी एकर जमीन बेचिराख केली. कोटय़वधी रुपयांचा चुराडा आणि लष्कर तैनात करण्याची वेळ सरकारवर आली आहे. यानिमित्ताने हवामान बदलाच्या परिणामांचे असे भीषण धोके समोर येण्यास सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियातील या आगीशी हवामान बदलाचा काही संबंध नाही असा सूर निघत असला तरी हवामानातील बदल हाच आगीच्या मुळाशी असून तोच घटक परिस्थिती आणखीन गंभीर करीत असल्याचा इशारा जगभरातील शास्त्रज्ञांनी दिला आहे. पर्यावरण बदलाचे वास्तव नाकारून ‘आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी’ या उक्तीप्रमाणे तेथील सरकारची वर्तणूक दिसत आहे. आग, दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे हवालदिल झालेल्या ऑस्ट्रेलिया सरकारने देशाच्या दक्षिण भागातील 10000 उंटांना ठार मारण्याचा निर्णय घेतला आहे. कारण काय, तर जंगले आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे उंट पाणी पिण्यासाठी नागरी वस्तीत घुसतात. उंट पाणी जास्त पितात. त्यामुळे नागरिकांना पिण्यास पाणी राहत नसल्यामुळे त्यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. निष्पाप जिवांचा बळी घेण्याचा आदेश देण्याइतका ‘माणूस’ कधीपासून न्यायाधीश झाला, असा सवाल जगभरातील प्राणीप्रेमींकडून केला जात आहे. ऑस्ट्रेलियातील जंगलातील वणव्यास वातावरणीय बदल मुख्यतः कारणीभूत असल्याचा अहवाल मागील वर्षी ऑस्ट्रेलियन सरकारनेच सादर केला होता. परंतु ऑस्ट्रेलियातील सध्याचे नेतृत्व हा अहवाल मान्य करण्यास तयार नाही. अमेरिका, रशिया, ब्राझील प्रमाणे ऑस्ट्रेलियातही कोळशाला काळे सोने मानतात. हे देश ऊर्जानिर्मितीसाठी बहुतांशी कोळसा या जीवाश्म इंधनावर अवलंबून आहेत. तापमान वाढ व हवामान बदलासाठी जीवाश्म इंधन जबाबदार ठरते. कोळसा उद्योगाशी निगडित पॉवरफुल लॉबी नेहमी जागतिक तापमान वाढ हे शुद्ध थोतांड असल्याचा खोटा प्रचार करते. याच मानसिकतेतून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी वातावरण बदल आणि आगीचा थेट संबंध जोडण्यास नकार दिला आहे. वातावरण बदलाची सरकारने गंभीरपणे दखल घ्यावी आणि योग्य पावले उचलावीत या मागणीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. पंतप्रधानांचा निषेध केला जात आहे. आग आणि आंदोलक दोघांना शांत करण्याचे दुहेरी आव्हान त्यांच्यासमोर आहे. ऑस्ट्रेलियात आग आणि वातावरणीय बदल हे एकमेकांची परिस्थिती आणखी बिकट करीत आहेत. आगीमुळे तापमान वाढते. वाढलेल्या तापमानामुळे वातावरणात बदल होऊन त्याचे गंभीर परिणाम पीक, पाणी व दैनंदिन जीवनावर होत आहेत.पसरलेली आग आणि त्यातून निर्माण झालेल्या तापमान वाढीमुळे पर्यावरणात एक घातकचक्र निर्माण झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. सध्या ऑस्ट्रेलियात उन्हाळा आहे. ज्या भागात आग लागली आहे तो प्रदेश कोरडा आहे. आग विझवण्यासाठी पाऊस आवश्यक आहे. परंतु लांबलेला पाऊस येण्याची नजीकच्या काळात सुतराम शक्यता दिसत नाही. कारण आगीच्या परिणामामुळे पाऊस या भागात फिरकू शकत नाही. अतिउष्ण तापमानामुळे या प्रदेशात कोरडे हवामान आहे. त्यामुळे चटकन पेट घेतला जातो. भडकून आग सर्वत्र पसरते. दुष्काळ आणि आगीमुळे दुर्मिळ नैसर्गिक संपत्ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्ती किती भयावह व रौद्र स्वरूप धारण करू शकते याचे हे डोळ्यात अंजन घालणारे उदाहरण ठरावे. गेली दहा वर्षे ऑस्ट्रेलिया भीषण दुष्काळाशी सामना करीत आहे. मागील वर्षी विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. प्रचंड उष्णतेमुळे बाष्पीभवन मोठय़ा प्रमाणात झाले.त्याचे गंभीर परिणाम वृक्षसंपदा आणि जमीन कोरडी पडण्यावर झाला. अमेरिका, चीन, रशिया यासारखी विकसित राष्ट्रे मोठय़ा प्रमाणात कार्बन उत्सर्जन करून जागतिक तापमान वाढीस हातभार लावतात. ही राष्ट्रे खऱया अर्थाने खलनायक आहेत. हवामान बदलाच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना ती नेहमी खीळ घालतात. आपल्या देशाच्या विकासाला खीळ बसू नये म्हणून जागतिक तापमान वाढ व हवामान बदलाचा काहीएक संबंध नाही, अशाप्रकारचा खोटा प्रचार ते करतात. कारण यामध्ये या प्रगत राष्ट्रांचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत. अर्थकारण हा कळीचा मुद्दा आहे. वास्तविक ऑस्ट्रेलियातील आगीची भीषणता वाढविण्यास वातावरणातील बदल हा मुख्य घटक कारणीभूत असताना त्याचा संबंध नसल्याचे दाखवून देण्याचा दांभिकपणे प्रयत्न सुरू आहे. हवामान बदलाच्या मूळ समस्येपासून लक्ष विचलीत करण्यासाठी जंगलातील आगी या लावण्यात आल्या असल्याचे सांगितले जाते. आग लागण्याचे नैसर्गिक अथवा मानवनिर्मित कारण असू शकते. पण आग कशामुळे लागली हा प्रश्न सध्या महत्त्वाचा नसून या आगीमुळे निर्माण झालेली उष्णता, अभूतपूर्व दुष्काळ आणि पावसाचे दुर्भिक्ष्य हे घटक आगीत आणखीन तेल ओतत आहेत. परिणामी निसर्गातील जलचक्र बिघडले आहे. अगोदरच या देशातील मोठा प्रदेश दुष्काळाशी सामना करीत आहे. आगीमुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन सुरू आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया हा वातावरण बदलाची आणखी मोठी शिकार होऊ शकतो. हा सर्वांनाच इशारा आहे. जागतिक तापमान वाढ 1.5 डिग्री सेल्सिअसच्या खाली ठेवण्याच्या उद्दिष्टापासून आपण भरकटत आहोत. अशा काही चुका व दुर्लक्षामुळे आपली वाटचाल तीन अंश डिग्रीच्या दिशेने सुरू आहे. पृथ्वी शीघ्र गतीने तापत असल्याचा इशारा शास्त्रज्ञ वारंवार देतात. पण अजून आपण डोळ्यावर कातडे ओढले आहे.ऑस्ट्रेलियातील वणव्यापासून जागतिक नेते काही धडा घेतील का, हे पहावे लागेल.
Previous Articleनागरिकता सुधारणा कायदा (सीएए) : मूळ कारण व काही शंका
Next Article खोऱयात विदेशी दूत, पाकचा दुष्प्रचार उघड
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.