भारताचा आघाडीवीर फलंदाज रोहित शर्माचा निर्वाळा, विविध स्तरावरील तर्कवितर्कांना पूर्णविराम
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
माझ्या धोंडशिरेच्या दुखापतीविषयी मला स्वतःलाच फारशी कल्पना नव्हती. सारे काही गोंधळाचे वातावरण होते. कोणी काय म्हणाले, याचीही मला माहिती नाही. पण, मी त्यावेळी देखील बीसीसीआय व मुंबई इंडियन्स यांच्या सातत्याने संपर्कात होतो. तूर्तास, उत्तम प्रगती आहे. मी धोंडशिरेच्या दुखापतीतून सावरत आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पूर्ण ताकदीने खेळण्याचा माझा प्रयत्न असेल, असे भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. यापूर्वी आयपीएल स्पर्धा सुरु असताना ऑस्ट्रेलियन दौऱयासाठी संघनिवड झाली आणि रोहितला त्यातून वगळल्याचे स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर स्वतः रोहितने प्रथमच मौन सोडले आहे.
रोहित शर्माने आयपीएल फायनलमध्ये 50 चेंडूत 68 धावांची झंझावाती खेळी साकारत आपला फॉर्म दाखवून दिला. शिवाय, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सला एकतर्फी विजय संपादन करुन दिला. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर देखील त्याने बेंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस ट्रेनिंगला सुरुवात केली.
‘टी-20 हा छोटेखानी क्रिकेट प्रकार असल्याने मी मैदानावर उतरु शकतो, क्षेत्ररक्षण करु शकतो’, असे मी मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाला कळवले होते. एकदा हा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यावर लक्ष केंद्रित करणे बाकी होते. धोंडशिरेची दुखापत आता बऱयापैकी कमी झाली आहे. कसोटीसाठी मैदानात उतरताना तंदुरुस्ती प्राप्त करण्यात काहीही कसर राहिलेली नाही, याची मला खात्री वाटते. त्यासाठीच मी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस ट्रेनिंगवर भर देत आहे’, असे रोहित पुढे म्हणाला.
‘आयपीएल स्पर्धेदरम्यान जे वादाचे मोहोळ उठले, त्याने माझ्यावर किंचीतही परिणाम झाला नाही. मी ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाऊ शकतो का, याबद्दल कोण काय म्हणते आहे, याची मला स्वतःला फारशी चिंता करण्याचे कारण नव्हते. एकदा दुखापत झाली, त्यानंतर पुढील 10 दिवसात मी काय करु शकेन, खेळू शकेन की नाही, यावर मी लक्ष केंद्रित केले. जोवर मैदानात उतरत नाही, तोवर देखील काही बाबी स्पष्ट होत नसतात. पण, यादरम्यान धोंडशिरेची दुखापत कमी होत गेली. सारे काही मनासारखे होत गेले आणि त्यामुळेच छोटय़ा ब्रेकनंतर मी पुन्हा मैदानात उतरु शकलो. जर प्रतिकूल घडले असते तर प्ले-ऑफमध्ये न खेळण्याचा निर्णय मी खुल्या दिलाने घेतला असता’, याचाही त्याने येथे उल्लेख केला.
‘प्रत्यक्ष कसोटी मालिकेपूर्वी मला स्वतःवर अद्याप बरीच मेहनत घ्यायची आहे आणि याचमुळे मी ऑस्ट्रेलियातील मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेत भाग घेणे टाळले. याशिवाय, मर्यादित षटकांच्या मालिकेत 11 दिवसातच 6 सामने खेळणे दमछाक करणारे ठरले असते. त्यामुळे, त्याऐवजी 25 दिवस मी तंदुरुस्तीवर मेहनत घेणे पसंत केले आहे’, असे रोहित शेवटी म्हणाला.