प्रतिनिधी / सातारा :
ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी रासपचे नेते महादेव जानकर यांच्या सुचनेनुसार रासपच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली जेलभरो आंदोलन केले. राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले.
आंदोलनावेळी बोलताना खंडू सरक म्हणाले, ओबीसी समाजासाठी राज्य सरकारने ओबीसी आयोग निर्माण करुन न्यायालयीन बाबींची पूर्तता करावी. आरक्षणाच्या संदर्भात जो डेटा निर्माण केला आहे, तो न्यायालयात जमा करावा. जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवला जात नाही. तोपर्यंत स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुका घेवू नयेत. तात्कालिन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी जनावरांची जनगणना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जनगणना करण्यात आली. परंतु ती जनावरे पाळणाऱ्या लोकांची जनगणना होत नाही. ओबीसीना हक्काचे आरक्षण मिळावे. राज्य सरकारने टाळाटाळ केली तर येत्या काळात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.