ऑनलाईन टीम / पुणे :
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे शहरात शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी बांधवाचा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियम पाळून हा मोर्चा आयोजित केला जाईल, असे आश्वासन आंदोलकांनी देऊनही शेवटच्या क्षणापर्यंत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने शनिवारवाडा येथे काही काळ संघर्षाचे वातावरण निर्माण झाले. अखरे या मोर्चाचे रूपांतर ठिय्या आंदोलनात होऊन ओबीसी बांधवांनी आपल्या मागण्या मांडल्या.
चर्चेअंती तोडगा न निघाल्याने पोलिसांनी माजी खासदार समीर भुजबळ, बापू भुजबळ, रूपाली चाकणकर, प्रितेश गवळी, दीपक जगताप यांच्यासह अन्य आंदोलकांना पोलिसांनी पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले.
या आंदोलनामागील भूमिका विशद करताना समीर भुजबळ म्हणाले की, अन्य कोणत्याही समाजाला आरक्षण देण्यास अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा विरोध नाही. मात्र इतर समाजांना आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास त्याला विरोध करीत हे कारस्थान आम्ही हाणून पाडू. त्यामुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करणे यासह आमच्या विविध मागण्या आहेत.
माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.