लोकांच्या जीवाशी खेळू नका ; अन्यथा टाळे ठोकणार – गणेश देशमुख
औंध / प्रतिनिधी
औंधमध्ये ३० बेडचे कोविड हेल्थ सेंटर सुरू होऊन महिना उलटला आहे. या कोविड सेंटरला सुविधांचा डोस मिळत नसल्याने येथील रुग्णांना गैरसुविधांचा सामना करावा लागत आहे. सुविधा अभावी रुग्णांची हेळसांड होणार असेल तर कोरोना सेंटर काय कामाचे असा संतप्त सवाल गणेश देशमुख यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने लोकांच्या भावनेशी खेळू नये अन्यथा टाळे ठोकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
औंधला कोरोना सेंटर सुरू झाल्यामुळे परिसरातील कोरोना रुग्णांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पळापळ करण्यापेक्षा इथे सोय झाली असली तरी, ह्या कोविड हेल्थ सेंटरला सुविधांची बोंबाबोंब आहे. येथील डॉक्टरवर्ग पाच – पाच दिवस हजर नसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने औंध ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. औंध ग्रामीण रुग्णालयात व कोविड हेल्थ सेंटरला औंध येथील गणेश देशमुख, शैलेश मिठारी,संजय यादव,अक्षय मगर आदींसह ग्रामस्थांनी रविवारी सायंकाळी अचानक भेट दिली, त्यावेळी तिथे रुग्णांना मिळत असलेल्या सोयी सुविधांची माहिती घेतली असता अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या. त्यामुळे ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
औंधला ग्रामीण रुग्णालयात आसपासच्या सुमारे ३५ खेड्यातील नागरिक ह्या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. त्यात कोविड हेल्थ सेंटर सुरू झाले मात्र हाच स्टाफ दोन्हीकडे ड्युटी करतोय. त्यामुळे इथली अवस्था एक ना धड भाराभर चिंध्या अशीच झाली आहे. त्यातच पाच – पाच दिवस डॉक्टर फिरकले नसल्याने रुग्णांचा उपचार कसा होणार ? रुग्ण बरे कसे होणार, तसेच मृत रुग्णाची हेळसांड थांबणार असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.या कारभारात सुधारणा न झाल्यास टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबद्दल ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र ते उपलब्ध झाले नाहीत.