पद्मश्री परत घेण्याची मागणी – तक्रारही दाखल – सोशल मीडियावरही ‘ट्रोल’
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कंगना राणावतच्या ‘2014 मध्ये खरे स्वातंत्र्य’ या विधानावरुन देशात जोरदार गदारोळ सुरू आहे. अभिनयापेक्षा वादांमुळे चर्चेत असलेली ही अभिनेत्री सोशल मीडियावरही ट्रोल झाली आहे. अनेक प्रकारचे मीम्सही शेअर केले जात आहेत. तसेच राजकीय पातळीवर महिला काँग्रेसने कंगनाकडून पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची मागणी केली आहे. तर, आम आदमी पक्षाने तिच्याविरोधात थेट तक्रारच दाखल केली आहे.
महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्षा डिसूझा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून कंगनाने स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केल्याचे म्हटले आहे. स्वातंत्र्य चळवळीचीही तिने खिल्ली उडवली आहे. अशा परिस्थितीत कंगनावर कारवाई करून तिच्याकडून पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तसेच आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या प्रीती शर्मा मेनन यांनी कंगनाच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे भाजप खासदार वरुण गांधी यांनीही टीका करताना कंगनाच्या वक्तव्याने दिवंगत स्वातंत्र्यसैनिकही दुखावले असतील, असे म्हटले आहे.