लांजा तालुक्यातील वेरळ घाटीत अपघात
प्रतिनिधी/ लांजा
लांजा तालुक्यातील वेरळ घाटीच्या तीव्र उतारावर नियंत्रण सुटलेला कंटेनर दरडीवर धडकून महामार्गाच्या मध्यभागी अडकला. शुक्रवारी सकाळी 6ग्न.30 च्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल 5 तासांनी हा कंटनेर बाजूला करत वाहतूक सुरूळीत करण्यात यश आले.
गोव्याहून मुंबईच्या दिशेने हा कंटेनर निघाला होता. शुक्रवारी सकाळी 6.30 च्या दरम्यान लांजा तालुक्यातील वेरळ घाटाच्या तीव्र उतारावर आला असता चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला. त्यामुळे कंटेनर विरुद्ध दिशेला जाऊन दरडीवर धडकला. तीव्र उतार आणि जोरदार धडक बसल्याने कंटेनरची पुढील बाजू विरुद्ध दिशेला फिरली. त्यामुळे भला मोठा कंटेनर महामार्गाच्या मध्यभागी अडकला. चालकाने बाहेर उडी मारल्याने तो बचावला.
कंटेनर महामार्गातच अडकून पडल्याने मुंबई व गोव्याच्या दिशेची वाहतूक पूर्णतः रखडली होती. लांजा पोलीस स्थानक व हातखंबा वाहतूक पोलिसांना अपघातस्थळी दाखल झाले. त्यानंतर कंटेनर हटवण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली. स्थानिक ग्रामस्थांच्या साहाय्याने हा कटेनर 11.15 च्या सुमारास बाजूला करण्यात आला. त्यामुळे सुमारे पाच तास ठप्प असलेला महामार्ग पुन्हा सुरू झाला.
कंटेनर बाहेर काढण्यासाठी हातखंबा वाहतूक पोलीस, टॅब पोलीस, लांजा पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस फौजदार चवेकर पंदेरे, जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सुनील पडळकर, महिला पोलीस सूर्यवंशी यासह स्थानिक नागरिकांनी मोठे सहकार्य केले.