बायोगॅस-खत निर्मिती प्रकल्प राबविण्याबाबत मनपाकडून मार्गदर्शन
प्रतिनिधी /बेळगाव
दररोज जमा होणाऱया कचऱयामध्ये हॉटेलमधील कचऱयाचे प्रमाण जास्त आहे. हॉटेल चालकांनी कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी बायोगॅस किंवा खत उत्पादन प्रकल्प सुरू करावा, अशी सूचना महापालिका आयुक्तांनी केली होती. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी विविध हॉटेलना भेटी देऊन कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची सूचना केली. बायोगॅस व खत निर्मिती प्रकल्प राबविण्याबाबत मार्गदर्शन केले.
शहरात दररोज 250 हून अधिक टन कचरा साचत आहे. सदर कचऱयाची उचल करून तुरमुरी डेपोमध्ये टाकला जातो. यामध्ये शाकाहारी व मांसाहारी हॉटेलमधील कचऱयाचे प्रमाण अधिक असल्याने कचऱयाची उचल करण्यासाठी दोन विशेष वाहनांची व्यवस्था केली आहे. यासाठी कामगारांची नियुक्ती करावी लागत असून खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कचऱयाचे प्रमाण कमी करण्याकरिता हॉटेलमधील कचऱयाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी हॉटेल चालकांवर सोपविण्याचा विचार प्रशासनाने चालविला आहे. याकरिता विशेष नियमावलीही केली आहे.
यापूर्वी अनेकवेळा बैठक घेऊन बायोगॅस प्रकल्प किंवा खत निर्मिती प्रकल्प राबविण्याची सूचना महापालिकेच्या स्वच्छता विभागाने केली होती. मात्र अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाच्या पहिल्याच बैठकीवेळी हॉटेल चालकांची बैठक घेऊन कचऱयाची विल्हेवाट लावण्याची सूचना महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी केली होती. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली असून, हॉटेलमधील कचऱयाची विल्हेवाट हॉटेल चालकांनीच लावावी, असे पत्र काही प्रमुख हॉटेल चालकांना दिले आहे. कचऱयाची उत्पत्ती जास्त असलेल्या हॉटेलना भेटी देऊन बायोगॅस किंवा खत निर्मिती प्रकल्प राबविण्याची सूचना करण्याची मोहीम पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते एच. व्ही. कलादगी यांनी सुरू केली आहे.
पहिल्या टप्प्यात 10 हॉटेलना पत्र…
पहिल्या टप्प्यात 10 हॉटेलची यादी तयार करण्यात आली असून, सर्वाधिक कचरा ज्या हॉटेलमधून जमा केला जातो त्यांना सदर पत्र देण्यात आले आहे. तसेच बायोगॅस व खत निर्मिती प्रकल्प राबविण्याबाबत एच. व्ही. कलादगी हे मार्गदर्शन करीत आहेत. बायोगॅस व खत निर्मिती प्रकल्प सुरू करण्याची सूचना हॉटेल चालकांना यापूर्वीही करण्यात आली होती. पण याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे मनपाच्या या मोहिमेला कितपत यश मिळणार, असा मुद्दा उपस्थित होत आहे.