मुतगा येथील नागरिकांकडून व्यवहार बंद ठेवून काटेकोरपणे पालन : गावचा सर्वांगीण विकास-समृद्धीसाठी घालतात साकडे
युवराज पाटील /सांबरा
मुतगा येथे गाव स्थापनेपासून कटबंद वार पाळण्याची जुनी प्रथा आजही कायम भक्तिभावाने पाळली जाते. साधारण पंधराव्या शतकात आदिलशहाच्या काळामध्ये गावची स्थापना झाली. तेव्हापासून आतापर्यंत गावात कटबंद वार पाळण्याची प्रथा कायम आहे.
यंदा भावकेश्वरी यात्रेनंतर येणाऱया अमावास्येला म्हणजेच गुरुवार दि. 28 रोजी दीप अमावास्येला हा वार पाळला जातो. या दिवशी गावातून कोणाला बाहेर जाता येत नाही व बाहेरून कोणाला गावात येताही येत नाही. ग्रामस्थ आपले सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवून कटबंद वाराचे काटेकोरपणे पालन करतात. गाव स्थापनेपासून इ. स. 1986 पर्यंत दर तीन वर्षांतून एकदा तीन दिवस ‘कटबंद’ वार पाळण्यात येत आहेत.
जनावरांना रोगराई होऊ नये, पिके व्यवस्थित येऊ देत, ही कटबंद वार पाळण्याची भावना अजूनही आहे. बुधवारी अमावास्येच्या रात्री गावातील वेशीदेवाची पूजा केली जाते. मनुष्यप्राणी व जनावरे यांना रोगराई होऊ नये, गावची समृद्धी व विकास व्हावा, असे साकडे घातले जाते.
त्यानंतर गुरुवार दि. 28 रोजी गावच्या हद्दीत वार पाळण्यात येणार आहे. या दिवशी गावातील दूध डेअरीसह सर्व दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहेत. बससेवेसह इतर वाहतुकीची कोणतीही व्यवस्था उपलब्ध असणार नाही. त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घेऊन कटबंद वाराचे आचरण करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
परंपरा-श्रद्धेनुसार पाळणूक
ग्रामस्थ पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा व श्रद्धेनुसार कटबंद वार भक्तिभावाने पाळतात. सध्या कोरोना रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून जनसंपर्क टाळणे, क्वॉरंटाईन आदी खबरदारी घेण्यात येत आहे. त्यावेळच्या नागरिकांनीही गावात रोगराई होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असावा. म्हणून एक दिवस कटबंद वार पाळण्यात येत असावा. त्यामुळेच ग्रामस्थ आजही अत्यंत श्रद्धेने हा वार पाळतात.
– एन. डी. बंडाचे (निवृत्त मुख्याध्यापक)
आरोग्य चांगले राहण्यास मदत
गाव स्थापनेपासून करबंद वार दर तीन वर्षांतून एकदा सतत तीन दिवस पाळत होते. मात्र, 1986 नंतर दर तीन वर्षांतून एक दिवस हा वार पाळण्यात येत आहे. हा वार पाळल्याने नागरिकांचे व जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
-शामराव पाटील
पद्धतीत बदल नाही
पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार कटबंद वाराचे आजही तितक्मयाच श्रद्धेने आचरण केले जाते. वार पाळण्याच्या पद्धतीत कोणताही बदल झाला नसून पूर्वीप्रमाणेच हा वार काटेकोरपणे पाळला जातो.
– गुंडू पाटील
गावच्या समृद्धीसाठीच नियम
आम्ही लहानपणापासून कटबंद वार कसा पाळला जातो हे पाहत आलो आहे. आताच्या युवा पिढीनेही पूर्वजांनी गावच्या समृद्धीसाठी जो नियम केला आहे, तसाच तो पुढे चालू ठेवावा. अमावास्येच्या रात्री गावातील वेशीदेवाची पूजा करून धार्मिक विधी केले जातात. गुरुवार दि. 28 रोजी कटबंद वार पाळण्यात येईल.
– हेमंत पाटील