वार्ताहर /हिंडलगा
समर्थ कॉलनी, लक्ष्मीनगर, गणेशपूर, हिंडलगा येथील दत्त मंदिराच्या मागील बाजूने जाणाऱया रस्त्याची दुर्दशा झाली आहे. पावसाळय़ात या रस्त्यावर गुडघाभर पाणी आणि चिखलामधून नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत असून तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत
आहे.
या परिसरात मोठी लोकवस्ती आहे. मात्र, त्यांना ये-जा करण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. पावसाळय़ात चिखल-पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून चालणे अवघड आहे. उन्हाळय़ात नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. तेव्हा तातडीने याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
ग्राम पंचायत आमच्याकडून घरपट्टी, पाणीपट्टी घेते. मात्र, या आमच्या भागाकडे ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा ग्राम पंचायत पदाधिकाऱयांनी तातडीने या परिसराची पाहणी करून समस्या सोडवावी, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.