प्रतिनिधी/सांगली
केंद्र सरकारकडून एनआरसी आणि सीएए कायदा आणला आहे. पण या कायद्याने देशातील नागरिकांना छावणीत जावून राहावे लागेल. जर हा कायदा लागूच करायचा असेल तर तो डीएनएवर लागू करावा आणि विदेशी डीएनए ज्यांचे आहे त्यांनाच देशाबाहेर काढा. हा कायदा तातडीने रद्द करण्यात आला नाही तर यापुढे जेलभरो आंदोलन करून कायदा रद्द करण्यास लावू, असे बहुजन क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी केंद्र सरकारला इशारा दिला.
बहुजन क्रांती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला सांगलीत चांगला प्रतिसाद मिळाला. सांगली-मिरजेसह जिह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. मिरजेत बंद दरम्यान एका रिक्षावर दगडफेक करण्यात आली. एसटी, बसेससह रिक्षा सेवा बंद करण्यातआली होती. अपवाद वगळता अनुचित प्रकार घडला नाही. सांगलीत कडकडीत बंद पाळून हजारोंच्या उपस्थितीत मोर्चा काढला. एकच पर्व-बहुजन सर्व या घोषणांनी सांगली दणाणून गेली.
या मोर्चाचे संयोजक डॉ. राजेंद्र कवठेकर म्हणाले, आजच्या भारत बंदची दखल जगभरातील मिडियाने घेतली आहे. या देशातील मूलनिवासींनाच खऱया अर्थाने सत्तेवर राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ज्यांचा डीएनए परदेशी आहे अशा युरेशियन लोकांना आता त्यांच्या देशात पाठवले जाईल. या देशात यादवी माजावी म्हणून संविधान मोडीत काढणारे कायदे आणले जात आहेत. त्यामुळे केवळ मुस्लिमच नव्हेतर इथल्या बहुजनांचे नागरिकत्व धोक्यात आले आहे. इथल्या मूलनिवासींना विदेशी ठरवण्याचे षडयंत्र रचले आहे. ईव्हीएम सारखी यंत्रणा सरकारच्या ताब्यात असल्यामुळे आज ते देशावर राज्य करत आहेत. भयानक कायदे करत आहे. आमची लढाई आता यापुढे कोणत्याही पक्षाशी नव्हे तर युरेशियन ब्राह्मणांशी आमची लढाई असेल.
बहुजन क्रांती मोर्चाने भारत बंदची हाक दिल्यानंतर बुधवारी सांगली शहरातील प्रमुख पेठांमध्ये बंदचे वातावरण होते. काहीजणांनी दुकाने उघडी ठेवली होती. परंतु मोर्चापुर्वीच काही कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून फेरी काढून बंदचे आवाहन केल्यानंतर पटापट उघडी असलेली दुकाने बंद झाली. अवघ्या काही वेळेत संपूर्ण सांगली बंद झाल्याचे चित्र दिसले. सांगलीसह उपनगरातही बंदचे आवाहन करण्यात आल्यामुळे तिथेही प्रतिसाद मिळाला. या मोर्चाची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून सुरू झाली. त्यामुळे मोर्चेकरी सांगलीत बसस्थानकासमोर उपस्थित झाल्यानंतर ही स्थिती पाहून बसस्थानकावरून एसटी बसेसची सेवा देखील बंद करण्यात आली. काही रिक्षा संघटनाही बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे पेठांमध्ये शुकशुकाट जाणवत होता. या मोर्चामध्ये सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्याच्याविरोधात फलक झळकत होते. तिरंगा झेंडय़ासह भगवे, निळे, पिवळे, हिरवे झेंडे फडकत होते.
जोरदार घोषणाबाजी करत मोर्चास सुरवात झाली. मारूती चौकातून मोर्चा कापडपेठ मार्गावरून राजवाडा चौकमार्गे स्टेशन चौकात आल्यानंतर सभेत रूपांतर झाले. हजारोंच्या संख्येने स्टेशन चौक परिसर गजबजून गेला. एकच पर्व..बहुजन
सर्व अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. प्रदेशाध्यक्ष संगीता शिंदे म्हणाल्या, सीएए, एनआरसी विरोधात रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. हा कायदा रद्द केल्याशिवाय गप्प बसणार नाही. डीएनएच्या आधारावर कायदा करा, अशी आमची मागणी राहील. कायदा रद्द केला नाहीतर संपूर्ण भारतात जेलभरो आंदोलन केला जाईल.
विक्रम कांबळे, मुफ्ती मुज्जमील, उत्तम कांबळे, शकुंतला कांबळे, उमर गवंडी, हाफीज महंमद अली, सतीश मोहिते, जयश्री पाटील, डॉ. महेश कांबळे, प्रल्हाद मलमे, प्रा. सुकुमार कांबळे यांनी भाषणातून भाजप सरकारवर जोरदार टीका केली. मोर्चासाठी मोठय़ा प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात होता.
काळय़ा रंगाचे टीशर्ट घालून या कायद्याला विरोध
काळय़ा टीशर्टवर या कार्यकर्त्यांनी सीएए, एनआरसी, एनपीआर लिहून त्यावर फुली मारली होती. तर काही कार्यकर्त्यांनी चहाची किटली मोठय़ा काठीवर टांगून कायद्याला विरोध दर्शवणारे स्टीकर लावले होते.
जिल्हय़ात दोन ठिकाणी दगडफेक
सांगलीत टिंबर एरिया येथे रिसवडे यांच्या फरशी दुकानावर काही कार्यकर्त्यांनी दगड मारले तर मिरजेतील रिक्षावर एका कार्यकर्त्यांने दगड मारून रिक्षा थांबविली. जिल्हय़ात या दोन ठिकाणी या दगडफेकीच्या घटना वगळता इतरठिकाणी हा बंद शांततेत झाला.