तरुण भारत संवाद
प्रतिनिधी/ सोलापूर
सीएए व एनआरसी या नागरिकत्व विधेयकाच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या भारत बंदला सोलापूर शहरात काही ठिकाणचा अपवाद वगळता अल्प प्रतिसाद मिळाला. नियमितपणे वाहतूक, दुकाने सुरळीत चालू होती. नागरिकत्व विधेयकाच्या विरोधात ‘मोदी सरकार, झुठी सरकार’, ‘ये आझादी झुठी, देश की जनता भुखी है’, आदी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत बहुजन क्रांती मोर्चाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. त्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली होती. मात्र सोलापुरात या भारत बंदला अल्प प्रतिसाद मिळाला असून, विजापूर वेस, बेगम पेठ व आसरा चौकातील काही भाग वगळता होटगी रोड, जुळे सोलापूर, विजापूर रोड, सात रस्ता, पार्क चौक, डफरीन चौक, शिवाजी चौक, बाळीवेस, टिळक चौक, अशोक चौक आदी शहरातील विविध ठिकाणाच्या बाजारपेठा नियमित सुरळीत चालू होत्या. प्रवासी वाहतूक, रिक्षा, शाळा, दवाखाने, बँकादेखील नियमितपणे सुरू होत्या.
बंदमुळे व्यापाऱयांची गोची
अनेक संघनांकडून सतत बंदची हाक देण्यात येत आहे. चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र बंद आणि आज भारत बंद याचा परिणाम थेट व्यापाऱयांच्या व्यावसायावर होत आहे. हे अमान्य असल्याने आज व्यापाऱयांनी भारत बंदला प्रतिसाद दिला नाही.
परिस्थितीनुसार विचार करणार
चेंबर ऑफ कॉमर्सने जरी कोणत्याही राजकीय पक्षाच्या बंदला साथ न देण्याची घोषणा केली आहे. मात्र ते चेंबर ऑफ कॉमर्स वेगळे आहे. शहरात दोन चेंबर ऑफ कॉमर्स अस्तित्वात आहे. तसा निर्णय आमचा नाही. व्यापाऱयांचे अनेक प्रश्न राजकीय लोकांना सोबत घेऊनच मार्गी लावाव्या लागतात. ज्या त्यावेळच्या परिस्थितीनुसार विचारविनिमय होऊन निर्णय घेण्यात येईल.
–केतन शहा, सचिव, चेंबर ऑफ कॉमर्स