तरुण भारत संवाद प्रतिनिधी / करमाळा
करमाळा शहर व तालुका सुरक्षित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे, सध्याची परिस्थिती पाहता तपासणी केलेल्या रुग्णांपैकी 25 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहेत, शासकीय जबाबदार अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात रुग्णांची संख्या हजाराच्या घरात जाणार आहे, यावेळी करमाळा शहर व तालुक्यात सेंटर उपलब्ध नसतील, ऑक्सिजन मिळणार नाही, गोरगरिबांचे हाल होतील, आर्थिकदृष्ट्या प्रबळ लोक उपचारासाठी पुणे मुंबईला जातील, यात गरिबांचे हाल होणार आहेत. कोरोना ही लागलेली आग आहे, ही लवकर संपणार नाही, पण या आगीची तीव्रता कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी रुग्णांची चेन तोडण्यासाठी आठ दिवसांचा करमाळा शहरासाठी कर्फ्यू करणे हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन गुरुवार दि. 10 सप्टेंबर ते बुधवार दि. 16 सप्टेंबरपर्यंत व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला आहे.
हा निर्णय अत्यंत योग्य आहे, या निर्णयाला करमाळा शहर, तालुका शिवसेनेचा जाहीर पाठिंबा आहे. तसेच या जनता कर्फ्यूला करमाळा तालुका इलेक्ट्रिकल मशिनरी व्यापारी, कापड व्यापारी, खते व्यापारी सह व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. किराणा व्यापारी असोशियन व त्यांच्या सर्व संघटनेच्या सदस्यांनी घेतलेल्या निर्णयाचे शिवसेना स्वागत करत आहे. तसेच या निर्णयात समाजातील सर्व घटकांनी आप आपल्यातील मतभेद वाद-विवाद राजकीय अहंपणा बाजूला ठेवून आपल्याला करमाळा शहर व तालुका सुरक्षित ठेवायचा आहे, ही भूमिका डोळ्यापुढे ठेवून सर्वांनी एकत्रित काम करावे, आता नगरपालिकेने ठोस पावलं उचलावित, असं मत शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी सांगितले.