प्रतिनिधी / शाहुवाडी
मलकापूर ता. शाहूवाडी येथील बाजारपेठेत सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाला असून विनामास्क फिरत असलेल्यांची संख्या वाढू लागली आहे. शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत असतानाही कुठेच गांभीर्य दिसत नसून प्रशासनाने कडक कारवाई करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
मलकापूर ही मुख्य बाजारपेठ असल्याने शहरात परिसरातील नागरिकांची गर्दी वाढतच आहे. लॉकडाऊन शितील केल्यानंतर शहरातील गर्दी दिवसागणिस वाढू लागली आहे. मुळातच शहरात आतापर्यंत 40 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या झाली आहे. दिवसागणिस वाढत असलेल्या कोरोनाची संख्या याबाबत नागरिकांच्यात अजूनही सतर्कता दिसत नसून बाजारपेठेत होणारी गर्दी त्याच बरोबर सोशल डिस्टंसिंगचा उडणारा फज्जा मास्क न घालता वाढलेली वर्दळ या सर्व बाबीकडे प्रशासनाने आता कडक भूमिका घेणे गरजेचे आहे.
स्वयम् शिस्त काळाची गरज
एका बाजूला कोरोनाचा वाढता कहर प्रशासनाला डोकेदुखी बनत आहे. सर्व बाबीवर प्रशासन सतर्कता घेत आहे. मात्र, प्रत्येक नागरिकाने स्वयम् शिस्त म्हणून स्वतः कोरोना योद्धा म्हणून जर जागृकता घेतली तर सर्वच सोयीचे होणार आहे. मात्र ही भूमिका प्रत्येकच्या मनात रुजणे गरजेचे आहे.
वारंवार प्रशासनाने सूचना व नियमांची अंमलबजावणी केली जात असली तरी नागरिकांनी ही स्वतःही यासाठी दक्ष राहणे गरजेचे आहे. एकूणच शाहूवाडी तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या पाचशेच्या पुढे गेली आहे. वाढता कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी शहरात सतर्कता व पूर्ण खबरदारी घेणे काळाची गरज आहे.
स्वतः स्वतःचे रक्षक
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आजच्या घडीला प्रत्येक नागरिकांनी स्वतः स्वतःचं रक्षक होऊन जर वज्रमूठ आवळली तर कोरोनाला अटकाव बसणं शक्य आहे मात्र अद्यापही त्या दृष्टीने कोणीच गांभीर्य घेत नसल्याने दिवसागणिस कोरोनाचा प्रसार वाढत आहे मी आणि माझे कुटुंब सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वच स्तरावर काळजी घेणे गरजेचे आहे अन्यथा हा धोक्याचा इशारा आहे